• Sat. Aug 15th, 2026

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 15, 2026

सातारा दि. १५ :-  महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, कास पठार, कोयनानगर आणि मुनावळे या प्रमुख पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष दिले जात असून यातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होणार आहेत. साताऱ्याला जागतिक दर्जाचे पर्यटन आणि सर्व बाबींमध्ये अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प आहे. पर्यटन प्रकल्पांसाठी आवश्यक तो संपूर्ण निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, माजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इमामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे परिवारजन यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात सातारा जिल्ह्याचे योगदान मोलाचे राहील, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश जागतिक स्तरावर तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहे. कृषी, संरक्षण, तंत्रज्ञान आणि परकीय गुंतवणुकीत भारताने अभूतपूर्व प्रगती केली असून, कृत्रिम बुद्धीमता (एआय) अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातही देश जागतिक स्तरावर स्पर्धा करत आहे. याच धर्तीवर शासनही जलद गतीने प्रगती करत असून शेतकरी, महिला आणि उद्योगांसाठी महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्याने सुरू केलेल्या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि  माझी शाळा – आदर्श शाळा योजनांची देशपातळीवर नोंद घेतली गेली आहे. शहरातील खाजगी दवाखान्यांच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे अत्याधुनिक केली जात आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये दर्जेदार सुविधा निर्माण करून शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम केले जात आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. कोयना नदीच्या पात्रातील उपलब्ध जलसंपत्तीचा पर्यटनासाठी उपयोग  करण्याच्या दृष्टीने दोन बोटिंग स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी एका ठिकाणी भूमिपूजन झाले असून दुसऱ्या ठिकाणचे निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात सातारा जिल्ह्यातील पर्यटकांना नदीपात्रातील नौकाविहाराचा नवा अनुभव उपलब्ध होणार आहे, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

राज्यातील जलसंधारणाच्या कामांमुळे कृषी क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. सातारा जिल्ह्यात उसाच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, यासाठी या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर विशेष उपक्रम राबवण्याचा निर्णय  घेतला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि थोर विभूतींचे स्मरण ठेवून युवा  पिढीने देशाच्या, राज्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान व विविध पुरस्कारांचे वितरण

पोलीस विभागामार्फत देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सेवा पदक, विविध शाळा व विद्यार्थ्यांचा सत्कार,  वीर माता व वीर पत्नी यांना जमिन वाटप, जिल्हाधिकारी कार्यालयातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात  आला. तसेच वन विभागाच्या दोन रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी उपस्थितांना मृदा व जलसंधारणाची शपथ व राष्ट्रीय नशा मुक्ती प्रतिज्ञाही देण्यात आली.
तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला पालकमंत्री श्री. देसाई यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केली. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय ते पोवई नाका काढण्यात आली.
तत्पूर्वी पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर शहीद कर्नल संतोष महाडीक स्मृती उद्यान येथे पुष्पचक्र अर्पण केले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed