Ratnagiri Triple Murder Case:रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात निष्काळजीपणा केल्यामुळे जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
रत्नागिरीतील भक्ती मयेकर या प्रेयसीची हत्या केल्यानंतर दुर्वास पाटील या नराधमाने आणखी दोन खून केल्याचे उघड झाले होते. या हत्याकांड प्रकरणात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली आहे.
Ratnagiri Crime : गर्लफ्रेंडला संपवून दरीत टाकलं, नंतर आणखी दोघांचा जीव घेतला; मुलाचं दुष्कृत्य लपवण्याचं बापाचं कारस्थान अन्…
संध्या कोसुंबकर यांचा आरोप
राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप सोशल मीडियाद्वारे रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी केला होता. या प्रकरणात लक्ष घालून तपास केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांचे त्यांनी कौतुक केले परंतू त्याच वेळा कुलदीप पाटील यांची बदली करून चालणार नाही तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वेळेत दुर्वास पाटीलच्या मुसक्या आवळल्या असत्या…
जयगड खंडाळा परिसरात असलेल्या सायली बार मध्येच भक्ती मयेकर हिचा खून करण्यात आला होता. इतकच नाही तर सिताराम वीर याला मारहाण व हत्येची माहिती असलेल्या राकेश जंगम याचाही खून दुर्वास पाटील याने केला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने गेल्या वर्षी जून मध्येच दाखल केली होती मात्र या प्रकरणात जयगड पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली आहे. राकेश जंगम हा बेपत्ता होण्याचा तपास योग्य दिशेने झाला असता दुर्वास पाटील याच्या मुसक्या जर का योग्य वेळेत आवळल्या गेल्या असत्या तर भक्ती मयेकरचा खून झाला नसता याकडेही येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी लक्ष वेधलं आहे.
त्या सातत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून या सगळ्या प्रकरणाकडे लक्ष वेधत आहेत. शनिवारी सकाळी ही काही मिनिटांपूर्वी त्यांनी एक नव्याने व्हिडिओ अपलोड केला असून त्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाबरोबरच त्यांनी रत्नागिरी येथील अन्य काही प्रकरणांकडे ही रत्नागिरी पोलिसांचे लक्ष वेधले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंत्री नितेश राणे यांनी मटका अड्ड्यावर टाकलेली धाड याचही त्यांनी कौतुक करत रत्नागिरीतही मटका जुगार व अवैध दारू धंद्यांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आसल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
पुण्यातून दोन महिलांना आणलं अन् रत्नागिरीत भलताच प्रकार उघड; नेपाळी महिलेला अटक
रत्नागिरीतील तिहेरी हत्याकांडाची जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांच्या व अप्पर जिल्हा परिषद बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस उपविभागीय अधिकारी नितिन माईनकर अधिक तपास करत आहेत.
