• Wed. Mar 11th, 2026
    रोहित ठोक रे यांना, यांची आज विकेटच टाकू; गोळीबारापूर्वी निलेश घायवळ टोळीने काय म्हटलं?

    Pune Nilesh Ghaywal Gang: एकीकडे पुण्यामध्ये टोळी युद्धाचा काळा इतिहास असताना या टोळीमधील सदस्य आपली दहशत माजवण्यासाठी कोणत्याही थराला पोहोचत असल्याचे चित्र सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे. सुरुवातीला दोन टोळ्यांमध्ये सुरू असणारे हे युद्ध आता सामान्य पुणेकरांच्या जीवावर उठायला लागल आहे. त्यामुळे पुण्यातील ही वाढलेली गुन्हेगारी थांबवण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजित दराडे, पुणे: पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. आधीच गँगवॉरने हादरलेल्या पुण्यामध्ये आता गुंडांची मजल सामान्य पुणेकरांना मारण्यापर्यंत आणि गोळ्या घालण्यापर्यंत पोहोचली आहे. पुणे तिथे काय उणे, असं म्हणण्या ऐवजी पुणे तिथे आणखी किती गुन्हे अशी म्हणण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे.

    आयुष कोमकर याच्या हत्येनंतर गँगवॉरचा प्रश्न पुन्हा उफळल्यानंतर गुंड निलेश घायवळ याचा टोळीतील गुंडांनी गुरुवारी (18 सप्टेंबर) कोथरूड परिसरामध्ये दोघांवर हल्ला केला. त्यातील एकाला गोळ्या घातल्या तर एकावर कोयत्याने हल्ला चढवला.

    यासंदर्भात निलेश घायवळ टोळीतील सदस्यांवर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकामध्ये कोथरूड परिसरातील शिंदे चाळ येथे असणाऱ्या मुठेश्वर मित्र मंडळाजवळ प्रकाश धुमाळ (वय 36) यांच्यावर घायवळ टोळीतील सदस्यांनी गोळीबार केला. प्रकाश धुमाळ हे रात्री साडेअकरा वाजता खेड शिवापुर येथून पार्टी करून आल्यानंतर आपल्या मित्रांसोबत बोलत उभे होते. त्यावेळेस निल्या घायवळ टोळीतील सदस्य तिथे पोहोचले आणि गाडीला साईड न दिल्याच्या किरकोळ कारणावरून त्यांनी थेट धुमाळ यांच्यावर गोळीबार केला.
    Maharashtra TimesPune Crime : आम्ही या भागाचे भाई; पुण्यात घायवळ टोळीचे सर्वसामान्यांवर हल्ले, मित्रांसोबत बोलत असतानाच…
    या संदर्भात प्रकाश धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी ‘तुला लय माज आला आहे का? इथे कशाला थांबला आहे. हा आमचा एरिया आहे, असे म्हणत रोहित ठोक रे यांना, मयऱ्या खाली उतरून बघरे यांना, यांची आज विकेटच टाकू’ असे म्हणत गोळीबार केला. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक यांच्यासह अन्य आरोपींवर विविध कलमांसह आर्म्स ऍक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे.

    धुमाळ यांच्यावर गोळीबार केल्यानंतर हे मस्तवाल गुंड पुढे गेले. पुढे गेल्यानंतर दहा मिनिटातच त्यांना वैभव तुकाराम साठे (19, रा. श्रीकृष्णनगर, सागर कॉलनी, कोथरूड) हा दिसला. या गुंडांनी वैभव साठे याच्यावर सुद्धा हल्ला चढवला. रात्री बाराच्या सुमारात वैभव साठे हा त्याचा मित्र सुनील हरळय्या आणि यश गोडावत यांच्यासोबत सागर कॉलनी येथे बसलेला होता. प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार करून पुढे आलेल्या मयूर कुंबरे आणि वैभव साठे याचा मित्र सुनील हरळय्या यांच्यात जुने वाद होते. या वादातून या गुंडांनी सुनीलला शिवीगाळ करायला सुरुवात केली. ‘याला मारून टाका, सोडू नका’ असं आरोपीनी म्हणताच सुनीलने तिथून पळ काढला. सुनील पळून जाताच या मस्तवाल गुंडांनी आपला मोर्चा वैभवकडे वळवला. ‘त्याच्या कपाळाला पिस्टल लावत, तू सुनील सोबत फिरतो का… तुला पण जिवंत सोडणार नाही, असे म्हणत गणेश राऊत याने त्याच्याकडील कोयत्याने वैभव साठेवर हल्ला केला’.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा