• Wed. Jun 17th, 2026
    Mumbai Local Train: वाढीव लोकल हव्यात? गाड्या बदलत राहा! मध्य रेल्वे प्रशासनाचा अजब अभ्यास अहवाल

    Mumbai Local Train: मध्य रेल्वेवरील एकूण फेऱ्यांची संख्या ३,६७०पर्यंत पोहोचणे शक्य आहे, असे अभ्यासात स्पष्ट केले आहे.

    central local(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : विलंब, बिघाड आणि गर्दी यांमुळे मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गांवरील प्रवासी प्रचंड त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून लोकलफेऱ्या वाढवण्याची मागणी केली जात आहे. त्यानुसार, लोकलफेऱ्या वाढवायच्या असतील, तर एका टोकापासून अन्य टोकापर्यंत अखंड लोकल चालवण्यापेक्षा स्वतंत्र विभाग पाडून त्यानुसार लोकल चालवण्याचा अजब अभ्यास अहवाल वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सादर केला आहे.

    म्हणजे एखाद्या प्रवाशाला सीएसएमटीहून कर्जत किंवा कसाऱ्याला जायचे असेल, तर त्याला ठाण्याला उतरून ठाणे-कल्याण, नंतर कल्याण-कर्जत किंवा कल्याण-कसारा असा गाड्या बदलत प्रवास करावा लागेल. एकंदर रोगापेक्षा इलाज भयंकर असा हा प्रकार आहे!
    Maharashtra TimesMumbai News: प्रसूतिगृहाची दैनावस्था; स्कॉटर कॉलनीतील महापालिकेची वैद्यकीय सेवा ‘व्हेंटिलेटर’वर
    सध्याच्या लोकल फेऱ्यांमध्ये ४५ टक्के वाढ करण्याच्या हेतूने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे माजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी हा अभ्यास अहवाल सादर केला आहे. रेल्वे संचालनात बदल हा याचा गाभा आहे. त्यासाठी मेट्रो रेल्वेच्या संचालनाचा आधार घेण्यात आला आहे. एका मेट्रो मार्गावरून अन्य मेट्रो मार्गावर जाण्यासाठी स्थानक बदलण्याची गरज भासते. त्याच धर्तीवर लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी या अहवालात पर्याय देण्यात आले आहेत. त्यानुसार, सीएसएमटी-ठाणे, ठाणे-कल्याण, कल्याण-कसारा, कल्याण-कर्जत आणि कर्जत-खोपोली असे धीम्या मार्गावर स्वतंत्र विभाग असावेत.

    जलद मार्गावर सीएसएमटी-कल्याण असा एकच विभाग असणार आहे. ट्रान्स हार्बरसाठी ठाणे/कळवा-वाशी/नेरूळ आणि सीएसएमटी-पनवेल, अशी पुनर्रचना निश्चित केली आहे. या मार्गावर स्वतंत्र रेल्वेगाड्या, लोकोपायलट, वेळापत्रक आणि समर्पित लोकोपायलट तसेच ट्रेन मॅनेजर असणार आहेत. यामुळे यापैकी कोणत्याही विभागात बिघाड झाल्यास त्याचा परिणाम अन्य विभागावर होणार नाही, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
    Maharashtra Timesबाळासाहेब ठाकरेच ब्रॅण्ड, तुम्ही नाही! भाजपच्या मेळाव्यात CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर टीका
    उपनगरी रेल्वेचे संचालन मेट्रोप्रमाणे केल्यास सुमारे एक हजार १४१ लोकल फेऱ्या वाढतील, असा दावाही या अभ्यासात करण्यात आला आहे. मात्र, या अहवालाची अंमलबजावणी म्हणजे लोकलफेऱ्या वाढीचा द्राविडी प्राणायाम ठरणार असून, खोपोली, कसारा, कर्जत येथील प्रवाशांना गाड्या बदलत गंतव्यस्थानी पोहोचण्याची कसरत करावी लागणार आहे. या संकल्पनेला प्रवाशांकडून तीव्र विरोध होण्याची दाट शक्यता आहे.

    अभ्यास अहवालानुसार, कल्याण-कसारा धीम्या मार्गावरील १५२ऐवजी ४८० लोकलफेऱ्या, कल्याण-कर्जत धीम्या मार्गावर २०८ऐवजी ४८० आणि सीएसएमटी-कल्याण जलद मार्गावर २७०ऐवजी ४८० फेऱ्या धावू शकतील. कर्जत ते खोपोलीदरम्यान धीम्या मार्गावर सध्याच्या ३४ऐवजी १२० फेऱ्या धावत्या करणे शक्य आहे.

    सध्या मध्य रेल्वेवर दररोज १,८१० फेऱ्या धावतात. याची विभागणी स्वतंत्र विभागात केल्यास फेऱ्यांची संख्या २,५२९ होईल. विभागवार लोकल संचालनामुळे नव्या १,१४१ फेऱ्या वाढवणे शक्य होणार आहे.
    Maharashtra TimesChhagan Bhujbal: भुजबळ, कुटुंबीय पुन्हा अडचणीत; बेनामी व्यवहारांद्वारे मालमत्ता जमवल्याचा प्राप्तिकर विभागाचा आरोप
    कल्याण येथे नवे फलाट, मेल-एक्स्प्रेस हाताळण्यासाठी कल्याण येथे कोचिंग कॉम्प्लेक्स, कल्याण येथे लोकल गाडी पार्किंग मार्गिका, ठाकुर्ली येथे ५० ते ७० साइडिंगसह नवीन कारशेड. सानपाडा ईएमयू वर्कशॉप ठाकुर्ली येथे नेणे अशा पायाभूत सुविधांची आवश्यकता असल्याचेही अहवालात स्पष्ट केले आहे. परळ, कुर्ला, डोंबिवली, अंबरनाथ, टिटवाळा आणि बदलापूर येथे आवश्यक फलाट रुंदी आणि फलाटांची दुतर्फा व्यवस्था अशा पायाभूत सुविधांची शिफारस अभ्यास अहवालात आहे.

    लोकल फेऱ्यांचा आढावा
    सध्या लोकल फेऱ्या १,८१०
    स्वतंत्र विभागानुसार फेऱ्या २,५२९
    वाढीव प्रस्तावित १,१४१
    एकूण वाढ ३,६७०

    अभ्यास अहवालानुसार
    मुख्य मार्ग (धीमा) सीएसएमटी-ठाणे ठाणे-कल्याण कल्याण-कसारा कल्याण-कर्जत कर्जत-खोपोली
    मुख्य मार्ग (जलद) सीएसएमटी-कल्याण
    ट्रान्स हार्बर- ठाणे-वाशी/नेरूळ
    हार्बर- सीएसएमटी-पनवेल

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा