• Thu. Jun 11th, 2026
    दादाने आयुष्य संपवलं, बहिणीने इन्स्टा चॅट उघडलं, मुंबईतील घटनेचा 8 महिन्यांनी भयंकर उलगडा, प्रेयसीने…

    Mumbai Man ends life : मानसिक तणावाखाली असलेल्या तरुणाने जानेवारीत आईकडून एटीएम कार्ड घेत २५ हजार रुपये काढले. ही रक्कम त्याने प्रेयसीला दिली होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणींनी बरेवाईट करण्याच्या घटना साधारणपणे ऐकायला मिळत असतात. परंतु मुंबईतील गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात प्रेयसीच्या छळामुळे तरुणाने जीव दिल्याची घटना समोर आली आहे.

    दोघांचे चॅट, इतर पुरावे आणि तरुणाच्या पालकांनी केलेल्या आरोपांवरून पोलिसांनी जवळपास आठ महिन्यांनंतर संबंधित तरुणीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

    गोवंडी येथे राहणाऱ्या तोहराबी सय्यद यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा शोएब हा नवी मुंबई येथील एका कॉल सेंटरमध्ये नोकरीला होता. त्याचे गोवंडी परिसरात राहणाऱ्या अरहमा अन्सारी या तरुणीवर प्रेम होते. मानसिक तणावाखाली असलेल्या शोएबने जानेवारीत आईकडून एटीएम कार्ड घेतले आणि २५ हजार रुपये काढले. ही रक्कम त्याने अरहमा हिला दिली.

    घरी आल्यानंतर, तो काहीही न बोलता खोलीत गेला. शोएब बराच वेळ बाहेर न आल्याने बहिणीने खिडकीतून पाहिले असता शोएब गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

    इन्स्टा चॅटवरून उलगडा

    शोएबच्या बहिणीने त्याचे इंस्टाग्राम उघडून अरहमा हिच्यासोबतचे चॅट पाहिले. अरहमा ही सोने आणि खर्चासाठी शोएबकडून पैसे उकळत होती, असे समोर आले. ती शोएबचा सर्व पगार घेऊ लागली. घरच्यांपासून लांब राहण्यासाठी दबाव टाकू लागली. या त्रासाला शोएब कंटाळला होता.

    छ. संभाजीनगरमधील हत्या प्रकरण

    दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर येथील सिडको भागात प्रमोद पाडसवान खुन प्रकरणातील आरोपी जयश्री दानवे हिला तातडीने अटक करावी, अशी मागणी सकल तेली समाजाने पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शहरात २२ ऑगस्ट रोजी प्लॉटसमोरील खडी हटवण्याच्या वादावरून प्रमोद पाडसवान याचा खून झाला. यातील आरोपी जयश्री दानवे फरारी आहे. तिने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला, मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला.

    हा अर्ज फेटाळून २४ दिवस उलटूनदेखील पोलिस प्रशासनाला जयश्रीला अटक करण्यात यश आलेले नाही. जयश्री दानवे हिला ताब्यात घ्यावे. अशी मागणी तेली समाज बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे पोलिस आयुक्तांना करण्यात आली. मनोज सन्तासे, कचरु वेळंजकर, साई शैलार, भगवान मिटकर, विलास राऊत, बद्रीनाथ ठोंबरे, शिवा महाले, दीपक राऊत उपस्थित होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा