Banjara Community Protest : बीड जिल्ह्यात व्हीजेएनटी प्रवर्गातून एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजाने महामोर्चा काढला आहे. हैदराबाद गॅझेटनुसार पूर्वी एसटीमध्ये समावेश होता, तो हक्क परत मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दर्शवला, मात्र धनंजय मुंडेंच्या एका वक्तव्याने समाजात नाराजी पसरली आहे.
2 सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती आणि यावरून राज्य सरकार ने हा गॅझेटचा जी आर मंजुर केला. या जीआरमध्ये बंजारा समाजाच्या लोकांचा पूर्वी एसटी प्रवर्गात समावेश होता. यावरून राज्यातील बंजारा समाज आता रस्त्यावर उतरला असल्याचे पाहावयास मिळत आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून देखील 75 वर्षे झाली आज देखील बंजारा समाज त्याच्या हक्काच्या आरक्षणा पासून वंचित राहिला आहे अशी भावना यावेळी बंजारा समाज आक्रमक राहिल्याचे दिसून येत आहे.
बीडमध्ये निघाला बंजारा समाजाचा महामोर्चा
बीड जिल्ह्यातील बंजारा समाज हा त्यांच्या हक्काच्या आरक्षणासाठी वाड्या वस्त्या ताड्यांतून बाहेर आला आहे त्यांनी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी हजारोंच्या संख्येने गाड्या आल्या. काही बंजारा बांधव हे त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत मोर्च्यात सहभागी झाले असल्याचे पाहावयास मिळाले. गावाच्या बाहेर हा समाज शेतीवर अवलंबून आहे आणि त्याला आज देखील त्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवले असल्याचे सांगण्यात आले आहे. आता एसटी प्रवर्गातून आरक्षण घेण्यासाठी समाज मुंबई अन् दिल्लीला जाण्यासाठी देखील कमी करणार नाही, अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
लोकप्रतिनिधींचा बंजारा समाजाला पाठिंबा
हैदराबाद गॅझेटनुसार, बंजारा समाज हा पूर्वी एसटी प्रवर्गात होता आणि त्यासाठी आता या सरकारने देखील हे गॅझेट लागू करावे, अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे या मागणीला आता बीड जिल्ह्यातील खासदार, आमदार यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे.
आज या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित परळीचे आमदार धनंजय मुंडे आले होते.
मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून झाली नाराजी
महामोर्चात सहभागी होत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपला पूर्वीपासून पाठिंबा असल्याचे म्हटले आणि वंजारा आणि बंजारा हे एकच असल्याचे सांगितले. या वक्तव्यावर मात्र बंजारा समाजात नाराजी झाल्याचे पाहावयास मिळाले.

