Nagpur Couple Commits Suicide : राज्यात दिवसेंदिवस आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक हृदयद्रावक घटना नागपूरमध्ये घडली आहे. शेतात जाऊन पती आणि पत्नी यांनी दोघांनी कीटकनाशक औषध प्राशन केलं. यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी मृत्यूशी झुंज देत आहे.
ही घटना नरखेड तालुक्यातील कुंभारपेठ, वॉर्ड क्रमांक 12 येथे काल रविवारी दुपारी घडली. अल्पभूधारक शेतकरी नामदेव संतोष बरडे (वय 70) यांच्याकडे ब्राह्मणी शिवारात अवघी दीड एकर शेती होती. पण वारंवार पिकावर येणारे नैसर्गिक संकट, अतिवृष्टी आणि अपुरे उत्पन्न यामुळे घरखर्च भागवणेच कठीण झालं होतं. शेतातून हातात काहीच उरत नसल्याने पत्नी लता नामदेव बरडे (वय 62) यांनी दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून संसाराचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मृत नामदेव बरडे आणि प्रकृती चिंताजनक असलेल्या लता बरडे यांनी रविवारी सकाळी शेतातील पिकांची पाहणी केली. पिकांची दयनीय अवस्था पाहून त्यांचं मन खचलं. यानंतर घरी परतल्यावर दुपारी दोघांनीही 12 ते 2 वाजताच्या सुमारास मोनोक्रोटोफॉस हे कीटकनाशक प्राशन केलं. शेजाऱ्यांना ही बाब कळताच त्यांना तातडीने नरखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Nagpur Rain : नागपुरात पावसाच्या दमदार सरी, वाहतुकीला फटका; अवकाळीमुळे जनजीवन प्रभावित; पुढील २४ तासही महत्वाचे
मात्र, डॉक्टरांनी नामदेव बरडे यांना मृत घोषित केलं तर पत्नी लता यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. बरडे दाम्पत्यावर बँकेचं कर्ज, बचत गटाचे कर्ज तसेच हातउसने घेतलेली रक्कम अशा अनेक देण्यांची सावली होती. शेतीतून न मिळणाऱ्या उत्पन्नामुळे कर्ज फेडणं अशक्य झालं होतं. ‘हे पैसे परत कसे करणार?’ या प्रश्नाने ते अस्वस्थ झाले होते. अखेरीस याच विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून ग्रामीण अर्थकारणातील अस्थिरता आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या ओझ्याचे प्रतिक आहे. कमी जमिनीवर कसणारे अल्पभूधारक शेतकरी हवामानातील बदल, बाजारभावातील चढ-उतार आणि कर्जाच्या वाढत्या दडपणात सापडून जात आहेत. सरकारने कर्जमाफीसह विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी त्या खऱ्या अर्थाने कितपत पोहोचतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Beed Rain Update : बीडला पावसाचा तडाखा! आष्टीतील पश्चिमेत सर्वदूर हाहाकार, अनेक गावं पाण्याखाली; शाळांना सुट्टी जाहीर
बरडे दाम्पत्याच्या या घटनेने नरखेड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गावकऱ्यांतून “शेतकऱ्यांना जगण्यासारख्या सुविधा कधी मिळणार?” हा प्रश्न पुन्हा एकदा ऐकू येत आहे. आत्महत्येची ही मालिका थांबवण्यासाठी केवळ आर्थिक मदत नव्हे, तर मानसिक आधार आणि स्थिर शेती धोरणांची गरज आहे.

