Prakash Mahajan left MNS : कुणीतरी जा म्हणण्यापेक्षा आपण स्वतःच गेलेलं बरं, रागलोभ असण्याचं कारण नाही, असं प्रकाश महाजन म्हणाले.
प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू, माजी खासदार पूनम महाजन यांचे काका, तर मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा आहेत. प्रकाश महाजन यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले असून ते अन्य पक्षात जाण्याची शक्यता दिसत नाही.
माझं वय वाढलं आहे. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, त्यामुळे मी थांबायचं ठरवलं आहे. कोणावर राग वगैरे नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी दिली. मी अत्यंत लहान प्रवक्ता आहे. माझे कशावरही आक्षेप नाहीत, मी कुठल्याही मोठ्या पदावर नव्हतो, त्यामुळे माझ्यासारखा प्रवक्ता राहिला काय, गेला काय, पक्षाला विशेष फरक पडत नाही, असंही महाजन म्हणाले.
आपली मनस्थिती या वयात चांगली राहिली पाहिजे, त्यामुळे मी या सगळ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे, असं प्रकाश महाजन राजीनाम्यानंतर म्हणाले. कुणीतरी जा म्हणण्यापेक्षा आपण स्वतःच गेलेलं बरं, रागलोभ असण्याचं कारण नाही, असंही महाजन म्हणाले.
वाईट या गोष्टीचं वाटतं की अमित ठाकरेंना दिलेला शब्द पाळू शकलो नाही. मात्र बाकी कशाचंही ओझं माझ्या मनावर नाही, असंही ते म्हणाले. याआधी मनसेच्या मुंबईतील शिबिराला आमंत्रित न केल्यामुळे प्रकाश महाजन नाराज झाल्याची चर्चा होती. त्यानंतर खुद्द अमित ठाकरेंनी त्यांची भेट घेत समजूत काढली होती. त्यानंतर महाजनांची नाराजी दूर झाल्याचंही बोललं जात होतं.
दरम्यान, भाजप खासदार नारायण राणे यांना आव्हान देणं प्रकाश महाजनांना भोवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज ठाकरेंची नाराजी त्यांनी ओढवून घेतल्याचंही बोललं जातं. राज आणि राणे यांच्यातील मैत्रीचं नातं सर्वश्रुत आहे. यातूनच राज ठाकरे महाजनांवर रागावल्याचंही बोललं जात असे.
याआधी, उद्धव आणि राज ठाकरे हे दोघं एकत्र आले नाहीत तर नियती माफ करणार नाही, असं प्रकाश महाजन म्हणत असत. परंतु हिंदीसक्तीच्या विरोधात ठाकरे बंधूंनी एकी दाखवल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. यात माझा कुठलाही राजकीय फायदा पाहत नाही, पण मराठी माणसाला हक्काची जागा मिळेल, अशी खात्री बाळगत ठाकरे बंधू भेट या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार झाल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या होत्या.
दोन भाऊ एकत्र यावेत ही माझी मनापासून इच्छा होती, मात्र त्यावेळी कोणाला आठवण नाही झाली की या माणसाने अशी भूमिका घेतली होती. मी जोपर्यंत तिथे होतो, प्रामाणिकपणे काम करत होतो. बाळासाहेबांच्या समाधीजवळ मी ठाकरे बंधू एकत्र यावेत, अशा सद्भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र आता दोन भाऊ आम्हालाच विसरले त्याला आम्ही काय करु शकतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा
