Maratha Reservation Protest: मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर सदस्य मंत्री जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आले आणि परिसरातील आंदोलकांच्या चेहऱ्यावर तणाव दिसायला लागला. आता तोडगा निघणार की, चर्चा फिस्कटणार, अशा चर्चा सुरू झाल्या. परभणीच्या एका तरुणांचा घोळका डॉएच बँकेसमोरील पदपथावर उभा राहून मोबाइलमध्ये वृत्तवाहिन्यांमधील थेट वृत्तप्रसारण ऐकत होता. ‘पाटलांनी आयत्या वेळी माघार घेता कामा नये,’ अशी चर्चा त्यांच्यात सुरू होती. गेल्या आंदोलनावेळी एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासनही फोल ठरल्याने आता आमचा कोणावरच विश्वास नाही, असे ते सांगत होते.
मंगळवारी सकाळी उच्च न्यायालयात या प्रकरणी पुन्हा सुनावणी सुरू झाली आणि न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आंदोलनच चुकीचे असल्याचे सांगितले. त्या पाठोपाठ दुपारी ३ वाजेपर्यंत आझाद मैदानही मोकळे करण्याचे पोलिसांचे पत्रही पोहोचले. आता आंदोलनाचे काय होणार, ही चिंता आझाद मैदान परिसरात जमलेल्या आंदोलकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ‘पाटील’ आता काय आदेश देतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.
संघर्षयोद्धा! डोळ्यांमध्ये अश्रू अन् चेहऱ्यावर समाधान, मनोज जरांगे पाटील यांनी सोडलं उपोषण, आझाद मैदानात मराठ्यांचा जल्लोष
या दरम्यान, पोलिसांनी आपली कुमक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, महापालिका मार्ग परिसरात पेरायला सुरुवात केली. महापालिका मुख्यालय, या परिसरातील इतर छोटे रस्ते येथे उभी असलेली आंदोलकांची वाहने हटवण्याचे आवाहन पोलिस करत होते. पण आंदोलक ठाम होते. अखेर आंदोलनातील काही नेत्यांच्या मदतीने सहपोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी, पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, पोलिस उपायुक्त निमित्त गोयल यांनी पोलिसांच्या मोठ्या तुकडीसह गाड्या हटवण्यास सुरुवात केली.
जरांगेंचं भाषण सुरु झालं अन्…
मनोज जरांगे पाटील यांनी बोलायला सुरुवात करताच, ‘पाटीलऽऽ पाटीलऽऽऽ’ अशा घोषणांनी आझाद मैदान परिसर दणाणला. सातारा गॅझेटची जबाबदारी जरांगे पाटील यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर सोपवताच ‘आता पुढील आंदोलन साताऱ्यात करावं लागतंय बहुधा,’ अशी प्रतिक्रिया एका तरुण आंदोलकाने व्यक्त करताच हशा उसळला. त्यानंतर आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना नोकरीबाबतची मागणी समोर आली. आंदोलकांपैकी बहुतांश लोक मराठवाड्यातील असल्याने ‘हैदराबाद गॅझेटचे काय,’ याबाबत उत्सुकता होती. अखेर हैदराबाद गॅझेट लागू होणार, अशी घोषणा जरांगे पाटील यांनी करताच संपूर्ण परिसर दणाणून गेला.
विजयासह मुंबईचा निरोप
मनोज जरांगे पाटील आणि आंदोलकांच्या सहा मागण्या मान्य केल्याचे मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केले आणि आंदोलकांनी ढोल-ताशे वाजवायला सुरुवात केली. गुलाल कधी उधळणार, असा प्रश्न आंदोलकांना विचारला असता ‘पाटील उपोषण सोडत नाही, तोपर्यंत गुलाल उधळणार नाही,’ असे उत्तर मिळाले. सरकार शासन निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत आमचा विश्वास नाही, असेही आंदोलकांचे म्हणणे होते. अखेर शासन निर्णय आला आणि त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मान्यतेची मोहर उमटवली आणि एकच जल्लोष सुरू झाला. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताच मराठा आंदोलकांनी गुलालाची उधळण करत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईच्या रस्त्यांवर चार दिवस मांडलेले ठाण, असंख्य गैरसोयींचा सामना करत केलेली जीवाची मुंबई, समाजमाध्यमांवर सुरू असलेल्या उलटसुलट चर्चा, या सगळ्यांपेक्षाही या विजयाने सुखावून मावळत्या सूर्यासह मराठा आंदोलकांनीही मुंबईचा निरोप घेतला.

