Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मागण्यांची अंमलबजावणी होणार असल्याचे सरकारच्या शिष्टमंडळानं म्हटले आहे. जीआर निघाल्यावर मुंबई सोडू असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. ‘आपण लढाई जिंकलो आहोत. काही मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल’, असा विश्वास सरकारने दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलकांचा विजय झाल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ‘जीआर निघाल्यावर एका तासात मुंबई सोडतो’, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यावर सरकारनेही ‘एका तासात आम्ही जीआर काढतो’, असं म्हटलं आहे.
Manoj Jarange Patil: जरांगेंच्या आंदोलनाचा विजय: हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी, सगेसोयरेबाबत काय ठरलं? राज्यपालांच्या सहीने GR निघणार
मनोज जरांगे यांची पहिली मागणी ही हैदराबाद गॅझिटियरनुसार अंमलबजावणी करण्याबाबत होती. राज्य सरकराने ही मागणी मान्य केली आहे. सातारा गॅझिटियरनुसार अंमलबजावणी करण्यास थोडा वेळ लागणार आहे. पण ते लागू करण्याबाबत छत्रपती घराण्याचे वंशज मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ग्वाही दिली आहे. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतही सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
‘सगळ्यात अगोदर राज्य मंत्रिमंडळाचे मराठा उपसितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि सर्व सदस्य यांचे सर्वांचे मन:पूर्वक कौतक करतो आणि स्वागत करतो. या अंतर्गत येणाऱ्या विषयाचे सचिव सुद्धा प्रत्यक्ष हजर आहेत. त्यांचे देखील मनापासून कौतुक आणि आभार. सगळे अधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक. विषय शांततेनं समजून घेण्याची आवश्यकता आहे. आपलं म्हणणं होतं ते आपण लेखी स्वरुपात सरकारला निवेदनातून सादर केलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ हे प्रत पुन्हा एकदा तुमच्या हातात देणार आहे. तुम्हाला ते मान्य असेल तर तासाभरात सरकार जीआर काढणार आहे’, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

