मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून समाजातील विविध घटक या आंदोलनकर्त्यांसाठी मदतीचा हात पुढे करत आहेत. राजकीय नेत्यांकडूनही या आंदोलनाला समर्थन दिलं जात असून काही पक्षाचे कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही मराठा आरक्षण आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडत मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाचं केलं आहे.मराठा आंदोलकांना मदत करण्याचं आवाहन करताना अमित ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे की, “सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत. म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत. ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे,” असं अमित ठाकरे म्हणाले.मनसे कार्यकर्त्यांना सूचना करताना अमित ठाकरे पुढे म्हणाले की, “माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे, जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे. लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे,” अशी आशाही अमित ठाकरेंनी व्यक्त केली आहे.