Virar Building Collapse Update : विरार पूर्वेकडील रमाबाई अपार्टमेंटला २०२० मध्ये वसई-विरार महापालिकेने दुरुस्तीची नोटीस बजावली होती, परंतु दुर्लक्ष केले गेले. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने विकासकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. वेळीच दुरुस्ती केली असती, तर मोठी दुर्घटना टळली असती, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.
मंगळवारी रात्री विरारच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना घडली होती. यामध्ये १७ जणांचा मृत्यू तर ९ जण गंभीर जखमी झाले होते. अनधिकृतपणे आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून इमारत बांधण्यात आल्याने पालिकेने या इमारतीच्या विकासकाविरोधात आणि जागा मालकाविरोधात गुन्हा दाखल करत ५ जणांना अटक केली होती. सुरुवातीला विकासक नितल सानेला पोलिसांनी अटक करत तपास सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास विरार पोलिसांकडून गुन्हे शाखा कक्ष ३ कडे सोपविण्यात आल्यानंतर पोलिसांनी साने याची कसून चौकशी केली असता, २०२०मध्ये इमारत दुरुस्ती करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याचे समोर आले. मात्र त्यानंतर या नोटिशींकडे दुर्लक्ष केल्याचे नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेवरून दिसून येत आहे. त्यामुळे या इमारतीची त्याचवेळी म्हणजेच ५ वर्षांपूर्वी दुरुस्ती केली असती तर ही दुर्घटना घडली नसती आणि निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले नसते, अशा प्रतिक्रिया वसई-विरारमधील नागरिकांकडून येत आहेत.
Virar Building Collapse : विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई, भागीदार दळवी कुटुंब गोत्यात, मुली-जावयांना अटक
आरोपींची रवानगी कोठडीत
रमाबाई अपार्टमेंट ही इमारत पालिकेची कोणतीही परवानगी न देता अनधिकृतपणे बांधण्यात आल्याने या प्रकरणी पालिकेने तक्रार दिल्यानंतर विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यामध्ये एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक असलेल्यांपैकी जमीनमालक शुभांगी भोईर (३८) संध्या पाटील (३५) तसेच सुरेंद्र भोईऱ (४६) आणि मंगेश पाटील (३५) यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तर विकासक नितल साने याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे

