• Wed. Mar 11th, 2026

    Manoj Jarange Patil: आझाद मैदानावर पाऊल ठेवताच जरांगेंची मोठी घोषणा; मराठा आंदोलकांना 10 महत्त्वाच्या सूचनाही दिल्या!

    Manoj Jarange Patil: आझाद मैदानावर पाऊल ठेवताच जरांगेंची मोठी घोषणा; मराठा आंदोलकांना 10 महत्त्वाच्या सूचनाही दिल्या!

    Maratha Mumbai Morcha: मनोज जरांगे पाटील हे आज सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले असून सरकारने गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच आंदोलकांनी शांतता राखावी, मुंबईकरांना त्रास होऊ नये, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.

    मुंबई: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईतील आझाद मैदानात पोहोचले असून त्यांनी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आझाद मैदानात पोहोचताच जरांगे पाटील यांनी आता सरकारने मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नसल्याची घोषणा केली. तसंच राज्यभरातून मुंबईत दाखल झालेल्या हजारो आंदोलकांना शांत राहण्याचं आणि मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचं आवाहन केलं आहे

    “आपलं ठरलं होतं की मुंबईला जायचं आणि आमरण उपोषण आझाद मैदानावरच करायचं. त्यानुसार आज आपण उपोषणाला सुरुवात केली आहे. आता तुमची जबाबदारी काय आहे? सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं, म्हणून मराठा समाजाने ठरवलं होतं की मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. त्यानुसार आपण मुंबई जामही केली. पण आता एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने आपल्याला सहकार्य केलंय, परवानगी दिली आहे. त्याबद्दल आपण काल-परवा मोठ्या मनाने सरकारचं कौतुकही केलं. आता आपल्याला उपोषणाला परवानगी मिळाली आहे, आता सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि शांततेत राहायचं,” असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजबांधवांना केलं आहे.

    Maratha Reservation: फडणवीस वातावरण चिघळण्यासाठी थांबलेत का? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अंधारे संतापल्या

    जरांगे पाटलांच्या आंदोलकांना कोणत्या सूचना?

    – कोणीही रस्त्यावर किंवा कुठेही गोंधळ घालायचा नाही.

    – कोणीही दगडफेक, जाळपोळ करायची नाही.

    – मुंबई आपण जाम केली, आता दोन तासांत मुंबईचे रस्ते मोकळे करा.

    – सर्वांनी पोलिसांना सहकार्य करा.

    – सरकारने जे मैदान दिलंय, तिथंच तुम्ही झोपा. काहीजण वाशी इथं जाऊन झोपा.

    – अधिकृत पार्किंगची व्यवस्था जिथं करण्यात आलीय तिथंच गाड्या लावा. हायवेवर गाड्या उभ्या करू नका.

    – मुंबईकरांना त्रास झाला नाही, पाहिजे ही जबाबदारी आपली आहे.

    – जे आम्हाला मुंबईत सोडण्यासाठी आले होते, त्यांनी परत माघारी गेलं तरी चालेल.

    – आपल्याला आरक्षण पाहिजे आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा, इतर कोणतीही गोष्ट करायची नाही.

    – आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed