• Fri. Mar 20th, 2026

    ओव्हरटेक करताना दुपट्टा ट्रकच्या चाकात अडकला अन् तरुणीचा भयंकर अंत, नागपुरात दोघांनी जीव गमावला

    ByMH LIVE NEWS

    Aug 25, 2025
    ओव्हरटेक करताना दुपट्टा ट्रकच्या चाकात अडकला अन् तरुणीचा भयंकर अंत, नागपुरात दोघांनी जीव गमावला
    नागपूर
     नागपूर जिल्ह्यात रविवारी दोन भीषण अपघात घडले आहेत. पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्कॉर्पियोने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. तर कामठी येथे नागपूर-जबलपूर मार्गावर ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.शनिवारी रात्री तान्हा पोळा साजरा करून वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे मार्गावरील गावातून मित्रमंडळी स्कॉर्पियोने परतत होती. त्यावेळी पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास स्कॉर्पियो उभ्या ट्रकवर आदळली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, स्कॉर्पियोचा पुढील भाग पूर्ण चकनाचूर झाला.

    या अपघातात प्रज्वल चव्हाण (निवासी निमखेडा बोरडा) याचा जागीच मृत्यू झाला. तर चेतन वाडीभस्मे, प्रणय कडू, प्रियंश बावणे, आकाश सोनेकर, रितिक चरडे, रितिक गडे हे सर्व निमखेडा बोरडा येथील तसेच प्रणय घोडेस्वार (निवासी बोधनी, ता. मोहाडी, जि. भंडारा) हे सर्वजण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सर्व जखमींना आणि मृतदेहाला कामठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

    तर, दुसरी घटना रविवारी नागपूर-जबलपूर मार्गावर कामठीतील हॉकी बिल्डिंगसमोर घडली ज्यात दुपट्टा ट्रकमध्ये अडकून तरुणीचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील कटनी येथील जागृती हुकुमचंद ठाकरे (20) आपल्या भाचा सागर दुर्गाप्रसाद ठोमरे (19) याच्यासोबत मोटारसायकलवरून जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करताना जागृतीची दुपट्टा ट्रकला अडकला. आणि क्षणात ती ट्रकच्या चाकाखाली गेली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर दोन्ही पाय मोडले. अपघातात भाचा सागरही गंभीर जखमी झाला. तात्काळ पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान जागृतीचा मृत्यू झाला. सागरवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

    नागपूर जिल्ह्यात एकाच दिवशी घडलेल्या या दोन अपघातांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे तान्हा पोळ्याचा आनंद साजरा करून परतणाऱ्या तरुणांच्या गाडीस अपघात झाला, तर दुसरीकडे किरकोळ दुर्लक्षामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. पोलीस प्रशासनाने अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून पुढील तपास सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed