• Sat. Jun 13th, 2026

    ‘तुमच्यामुळे आमचं सरकार, पुढील पाच वर्ष…’; लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    ByMH LIVE NEWS

    Aug 23, 2025
    ‘तुमच्यामुळे आमचं सरकार, पुढील पाच वर्ष…’; लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

    Rakhi Pradan Program Devendra Fadnavis : आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राखी प्रदान कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लाडक्या बहि‍णींना आश्वासन दिलंय की, पाच वर्ष कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही, आणि लाडकी बहीण योजना देखील सुरुच राहणार आहे. तुमच्या आशिर्वादाने आमचं सरकार आलंय, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

    देवेंद्र फडणवीस ऑन लाडकी बहीण योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : ‘महाराष्ट्रातून आतापर्यंत ३६ लाख ७८ हजार बहि‍णींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. राख्या पोहोचल्या आहेत आणि काहींनी पत्राद्वारे त्यांच्या भावना पोहोचवल्या आहेत. त्या तमाम बहि‍णींची राखी आणि प्रेम मी स्वीकारतो, आणि जन्मभर मला या प्रेमातच राहायचं आहे. मला या प्रेमाचं उत्तरायी कधीच व्हायचं नाही, हे देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो’, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते मुंबई येथे राखी प्रदान कार्यक्रमात बोलत होते.

    लाडक्या बहिणींमुळे मुख्यमंत्री झालो

    देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ‘संपूर्ण महाराष्ट्रात रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवला. सर्व बहि‍णींच्या राख्या आणि प्रेम स्वीकारतो. आम्ही नाती निभावणारे लोकं आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाच्या विकासाचं स्वप्न बघितलं. त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट सांगितली, की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर, लोकसंख्येचा ५० टक्के हिस्सा जोपर्यंत या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे महिला लक्षित योजनांच्या माध्यमातून विकास हा मोदींनी सुरु केला. महिला केंद्रित विकास हे मॉडेल देशामध्ये मोदींनी सुरु केलं. बेटी बचाव, बेटी पढावपासून हा प्रवास सुरु झाला. तो प्रवास आता लखपती दीदीपर्यंत येऊन पोहोचला आहे. मी लाडक्या बहि‍णींमुळे मुख्यमंत्री झालो. नव्या भारतात बहिणी समान भागीदार असतील’, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
    Maharashtra TimesAC कोचच्या शौचालयातील कचराकुंडीत मुलीची बॉडी सापडली; मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये खळबळ

    ‘आज ज्या काही वेगवेगळ्या योजना सुरु केल्या, अनेक लोकं असं म्हणायचे की निवडणुकीपुरता सुरु केल्या आहेत. निवडणूक संपली की योजना बंद होतील. मी तुम्हाला सांगतो, पाच वर्ष मी यातली एकही योजना बंद होऊ देणार नाही. पाच वर्षाने तुमच्या आशिर्वादाने पुन्हा सरकार आलं तर पुन्हा पाच वर्ष सुरु राहतील. २०२९ला लाडक्या बहि‍णींचं सरकार येणार आहे. आम्ही सुरु केलेली लाडकी बहीण योजना देखील पाच वर्ष बंद होणार नाही’, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा