CM Devendra Fadnavis Call Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडीला मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानक बैठक बोलावली आहे. या बैठकीमुळे मुंबईत हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते या बैठकीत उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत सध्या गणेशोत्सवची लगबग आहे. अशा काळात मनोज जरांगे यांचा लाखो मराठ्यांचा सहभाग असलेला मोर्चा मुंबईत धडकला तर अनेक प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार सतर्क झालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावल्याची माहिती आहे. या बैठकीत अनेक मराठा नेतेही उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठकीचं नियोजन करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला हजर राहणार आहेत. येत्या 27 ऑगस्टला गणेशोत्सवला सुरुवात होणार आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे 29 ऑगस्टला सकाळी मुंबईत मोर्चासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई महापालिका, पोलीस प्रशासन यांच्यावर मोठा ताण येण्याची शक्यता आहे. कारण मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला लाखोंच्या संख्येने येण्याचं आवाहन केलं आहे. पण जरांगे यांच्या मोर्चाच्या काळात मुंबईत गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे या मोर्चावर तोडगा निघतो का? यासाठी सरकारची चाचपणी सुरु आहे. त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.
बैठकीत काय तोडगा निघणार?
मनोज जरांगे यांनी याआधीदेखील अनेकदा उपोषण केलं आहे. तसेच त्यांनी याआधीदेखील लाखो मराठ्यांसोबत मुंबईच्या दिशेला मोर्चा आणला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे आलेल्या मराठ्यांच्या मोर्चाला भेट दिली होती. एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथे भेट घेत त्यांची मनधरणी केली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी काही आश्वासनं दिली होती. तशाच प्रकारे यावेळीदेखील मनोज जरांगे यांना काही आश्वासने देण्याबाबत बैठकीत निर्णय होऊन यावर तोडगा निघतो का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा