• Wed. Mar 11th, 2026
    रोहित पवार यांना जामीन मंजूर, विशेष PMLA कोर्टाचा मोठा निर्णय

    Rohit Pawar : कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांना दिलासा मिळाला आहे. रोहित पवार यांना विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. रोहित पवार यांनी यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना विशेष पीएमएलए कोर्टाने दिलासा दिला आहे. कथित शिखर बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात रोहित पवार यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. रोहित पवार आज स्वत: कोर्टात सुनावणीसाठी गेले होते. रोहित पवार यांनी कोर्टात आपली बाजू मांडली. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर रोहित पवार यांना जामीन मंजूर झाला. रोहित पवार यांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.

    शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीने रोहित पवार यांच्याविरोधात मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी ईडीने बारामती अॅग्रो कंपनीची 50 कोटींपेक्षा जास्त रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणी रोहित पवार ईडी चौकशीला देखील सामोरे गेले होते. राजकीय द्वेषातून आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. अखेर या प्रकरणात आज रोहित पवारांना जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत भूमिका मांडली आहे.

    रोहित पवार काय म्हणाले आहेत?

    “राजकीय दबावाखाली असलेल्या ईडीने माझ्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असलं तरी या आरोपपत्रालाच माझा विरोध आहे. पण आता प्रकरणाचा चेंडू न्यायालयाच्या ‘कोर्टात’ आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या यंत्रणा जरी सरकारच्या हातचं बाहुलं म्हणून काम करत असल्या तरी माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

    “आज पहिल्या सुनावणीसाठी मुंबईत विशेष पीएमएलए न्यायालयात उपस्थित राहिलो असता माझी सामाजिक प्रतिष्ठा आणि यापूर्वी ईडीला चौकशीकामी केलेलं सहकार्य बघता न्यायालयाने केवळ पीआर बॉण्ड घेण्याचे निर्देश दिले. तसेच या गुन्ह्यात मला केवळ राजकीय द्वेषातून अडकवलं असल्याने माझ्यासोबतच माझ्या बारामती ॲग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करु नये, अशी विनंती न्यायालयाला केली होती, तीही न्यायालयाने मान्य केली, याबाबत न्यायालयाचे आणि योग्य पद्धतीने सत्य बाजू मांडल्याबद्दल माझ्या वकीलांचेही मनापासून आभार! विरोधात बोलत असल्याने सरकारने कितीही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सरकारसोबत हातमिळवणी करणार नाही आणि सरकारविरोधातील आवाजही बंद होणार नाही”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    कथिक शिखर बँक प्रकरणाची नेहमी चर्चा होत असते. हे प्रकरण कारखान्याच्या लिलावाशी संबंधित आहे. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड कंपनीने छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड कारखाना लिलावात विकत घेतला होता. पण 30 ऑगस्ट 2012 च्या कथित मूल्यांकन अहवालाच्या आधारे अत्यंत कमी किंमत (जवळपास 50 कोटी रुपये) निश्चित करुन कारखान्याचा लिलाव झाल्याचा ईडीला संशय आहे. या लिलावात रोहित पवारांच्या कंपनीसह एकूण 3 जणांचा सहभाग होता. त्यापैकी दुसरा व्यावसायिक हा बारामती अ‍ॅग्रोशी संबंधित आहे. त्याला कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. तसेच त्याची तितकी आर्थिक क्षमताही नाही, असा ईडीचा आरोप आहे. याच प्रकरणावरुन रोहित पवार यांना आज जामीन मंजूर झाला आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा