Rohit Pawar : कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांना दिलासा मिळाला आहे. रोहित पवार यांना विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. रोहित पवार यांनी यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीने रोहित पवार यांच्याविरोधात मोठी कारवाई केली होती. या प्रकरणात आरोपपत्र दाखल होण्यापूर्वी ईडीने बारामती अॅग्रो कंपनीची 50 कोटींपेक्षा जास्त रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणी रोहित पवार ईडी चौकशीला देखील सामोरे गेले होते. राजकीय द्वेषातून आपल्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. अखेर या प्रकरणात आज रोहित पवारांना जामीन मंजूर झाला. जामीन मंजूर झाल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत भूमिका मांडली आहे.
रोहित पवार काय म्हणाले आहेत?
“राजकीय दबावाखाली असलेल्या ईडीने माझ्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असलं तरी या आरोपपत्रालाच माझा विरोध आहे. पण आता प्रकरणाचा चेंडू न्यायालयाच्या ‘कोर्टात’ आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या यंत्रणा जरी सरकारच्या हातचं बाहुलं म्हणून काम करत असल्या तरी माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
“आज पहिल्या सुनावणीसाठी मुंबईत विशेष पीएमएलए न्यायालयात उपस्थित राहिलो असता माझी सामाजिक प्रतिष्ठा आणि यापूर्वी ईडीला चौकशीकामी केलेलं सहकार्य बघता न्यायालयाने केवळ पीआर बॉण्ड घेण्याचे निर्देश दिले. तसेच या गुन्ह्यात मला केवळ राजकीय द्वेषातून अडकवलं असल्याने माझ्यासोबतच माझ्या बारामती ॲग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करु नये, अशी विनंती न्यायालयाला केली होती, तीही न्यायालयाने मान्य केली, याबाबत न्यायालयाचे आणि योग्य पद्धतीने सत्य बाजू मांडल्याबद्दल माझ्या वकीलांचेही मनापासून आभार! विरोधात बोलत असल्याने सरकारने कितीही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सरकारसोबत हातमिळवणी करणार नाही आणि सरकारविरोधातील आवाजही बंद होणार नाही”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कथिक शिखर बँक प्रकरणाची नेहमी चर्चा होत असते. हे प्रकरण कारखान्याच्या लिलावाशी संबंधित आहे. रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेड कंपनीने छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड कारखाना लिलावात विकत घेतला होता. पण 30 ऑगस्ट 2012 च्या कथित मूल्यांकन अहवालाच्या आधारे अत्यंत कमी किंमत (जवळपास 50 कोटी रुपये) निश्चित करुन कारखान्याचा लिलाव झाल्याचा ईडीला संशय आहे. या लिलावात रोहित पवारांच्या कंपनीसह एकूण 3 जणांचा सहभाग होता. त्यापैकी दुसरा व्यावसायिक हा बारामती अॅग्रोशी संबंधित आहे. त्याला कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. तसेच त्याची तितकी आर्थिक क्षमताही नाही, असा ईडीचा आरोप आहे. याच प्रकरणावरुन रोहित पवार यांना आज जामीन मंजूर झाला आहे.

