• Sun. Mar 8th, 2026
    ‘प्रत्येक वेळी सत्ता असेल तरच काम होत नाही, संबंध महत्त्वाचे…’ अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला, चर्चांना उधाण

    Ajit Pawar : नागपूरमध्ये कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत अजित पवारांनी मोठे विधान केले आहे. केवळ सत्तेत असल्यावरच कामे होत नाहीत, अधिकाऱ्यांशी संबंध महत्त्वाचे असतात. त्यांच्या या विधानाने चर्चेला उधाण आलं आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी लोकांचा विश्वास जिंकावा आणि अधिकाऱ्यांशी योग्य संवाद साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जितेंद्र खापरे, नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी विदर्भ दौऱ्यावर असताना नागपूर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी थेट अजित पवारांसमोर नाराजी व्यक्त केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या त्यांनी उघडपणे मांडल्या. यावर प्रत्युत्तर देताना अजित पवारांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, प्रत्येक वेळी सत्ता असेल तरच काम होते असे नाही, आपण अधिकाऱ्यासोबत कसे संबंध ठेवतो यावर बरेच ठरते.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी जिथे जातो तिथे तेथे लोकांच्या कामासाठी स्वतंत्र स्टाफ ठेवलेला आहे. “पण माझ्या स्टाफने सांगितलं की माझ्याकडे कोणीच येत नाही आणि काम सांगितलं तरी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे केवळ तक्रार करून काही साध्य होत नाही,”

    ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री असल्याने सगळेच काम होतात असे नाही. घटनेने सरकार चालते, काही कामात मार्ग निघतो काहीं कामात निघत नाही. सरकार हे घटनात्मक चौकटीत चालते. “प्रत्येक काम होईलच असे नाही. काही कामे नियमात बसतात, काही नाही. जेव्हा एखादं काम होणार नाही असं वाटतं, तेव्हा मी सरळ सांगतो की हे शक्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले की, “तुम्ही काम केले तरच लोक तुम्हाला मत देता असे नाही तर तुम्ही कोणता मुद्दा उचलता आणि ते आवडत त्यावरून लोक मत देतात. यावर मतदारांचा विश्वास ठरतो.” पक्ष कार्यकर्त्यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवावी. “जर कुणी माझ्या नावाचा गैरवापर करत असेल तर आम्ही ते नक्कीच पाहू. तसेच एखादी महिला कामासाठी आली तर तिला मदत होईल असा विश्वास असावा,” असेही ते म्हणाले.

    अधिकाऱ्यांबाबत बोलताना अजित पवारांनी ठाम भूमिका घेतली. “तुम्ही योग्य काम घेऊन आलात आणि अधिकारी टाळाटाळ करत असतील तर मला कळवा. मग त्यांना कोणत्या भाषेत बोलायचं ते मी ठरवेन. पण प्रशासनाचा सन्मान राखला पाहिजे कारण ते जनतेचे सेवक आहेत,” असे त्यांनी सांगितले.

    आगामी निवडणुकांकडे लक्ष वेधून त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या की, “चांगले कार्यकर्ते हेरले पाहिजेत. अनेकदा काही कार्यकर्ते पुढे पुढे करतात पण निवडणुकीत ५० मतदेखील मिळवत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने पक्षवाढ करणाऱ्या लोकांवर भर द्यायला हवा.”

    गोंदिया-भंडारा सहकारी निवडणुकीत अनेक उमेदवार विजयी झाले असल्याचे नमूद करून अजित पवारांनी समाधान व्यक्त केले. मात्र, काही पदाधिकारी पदाचा वापर पक्षवाढीसाठी न करता व्यक्तिगत फायद्यासाठी करतात, अशा तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यावर लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.… आणखी वाचा