Ajit Pawar : नागपूरमध्ये कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत अजित पवारांनी मोठे विधान केले आहे. केवळ सत्तेत असल्यावरच कामे होत नाहीत, अधिकाऱ्यांशी संबंध महत्त्वाचे असतात. त्यांच्या या विधानाने चर्चेला उधाण आलं आहे. निवडणुकीत कार्यकर्त्यांनी लोकांचा विश्वास जिंकावा आणि अधिकाऱ्यांशी योग्य संवाद साधावा, असेही आवाहन त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी जिथे जातो तिथे तेथे लोकांच्या कामासाठी स्वतंत्र स्टाफ ठेवलेला आहे. “पण माझ्या स्टाफने सांगितलं की माझ्याकडे कोणीच येत नाही आणि काम सांगितलं तरी कोणी पुढे येत नाही. त्यामुळे केवळ तक्रार करून काही साध्य होत नाही,”
ते पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री असल्याने सगळेच काम होतात असे नाही. घटनेने सरकार चालते, काही कामात मार्ग निघतो काहीं कामात निघत नाही. सरकार हे घटनात्मक चौकटीत चालते. “प्रत्येक काम होईलच असे नाही. काही कामे नियमात बसतात, काही नाही. जेव्हा एखादं काम होणार नाही असं वाटतं, तेव्हा मी सरळ सांगतो की हे शक्य नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाची जबाबदारी कार्यकर्त्यांवर असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले की, “तुम्ही काम केले तरच लोक तुम्हाला मत देता असे नाही तर तुम्ही कोणता मुद्दा उचलता आणि ते आवडत त्यावरून लोक मत देतात. यावर मतदारांचा विश्वास ठरतो.” पक्ष कार्यकर्त्यांनी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवावी. “जर कुणी माझ्या नावाचा गैरवापर करत असेल तर आम्ही ते नक्कीच पाहू. तसेच एखादी महिला कामासाठी आली तर तिला मदत होईल असा विश्वास असावा,” असेही ते म्हणाले.
अधिकाऱ्यांबाबत बोलताना अजित पवारांनी ठाम भूमिका घेतली. “तुम्ही योग्य काम घेऊन आलात आणि अधिकारी टाळाटाळ करत असतील तर मला कळवा. मग त्यांना कोणत्या भाषेत बोलायचं ते मी ठरवेन. पण प्रशासनाचा सन्मान राखला पाहिजे कारण ते जनतेचे सेवक आहेत,” असे त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकांकडे लक्ष वेधून त्यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या की, “चांगले कार्यकर्ते हेरले पाहिजेत. अनेकदा काही कार्यकर्ते पुढे पुढे करतात पण निवडणुकीत ५० मतदेखील मिळवत नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने पक्षवाढ करणाऱ्या लोकांवर भर द्यायला हवा.”
गोंदिया-भंडारा सहकारी निवडणुकीत अनेक उमेदवार विजयी झाले असल्याचे नमूद करून अजित पवारांनी समाधान व्यक्त केले. मात्र, काही पदाधिकारी पदाचा वापर पक्षवाढीसाठी न करता व्यक्तिगत फायद्यासाठी करतात, अशा तक्रारी आल्याचे त्यांनी सांगितले आणि त्यावर लक्ष ठेवले जाईल, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त केले.

