मुंबई आणि लगतच्या इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाकडून पुढच्या काही तासांसाठी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रात राज्यभरात मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे सर्वत्र पाणी भरलं आहे. मुंबईची लाईफलाइन मानली जाणारी लोकल ट्रेन ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. रस्ते मार्ग पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. दुपारी पावसाने थोडीसी उसंत घेतली होती. पण पावसाने पुन्हा रौद्ररुप धारण केलं आहे. हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची धाकधूक वाढली आहे. फक्त पाऊसच नाही. वारा देखील तितकाच वेगाने वाहत आहे.
भारतीय हवामान विभागाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांना पुन्हा एकदा हवामान विभागाकडून तीन तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी आणि त्यासोबत 40 ते 50 किलोमीटर प्रति तास किंवा 60 किलोमीटर प्रति तास वेग घेणारे वारे वाहण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे कोलमडली
मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका हा मध्य रेल्वेला बसलं आहे. मध्य रेल्वे सहा ते सात तासांपासून ठप्प झाली आहे. ठाणे, दादर, कुर्ला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण या स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली आहे. जो तो आपापल्या घरी जाण्यासाठी व्याकूळ झाला आहे. पण लोकल ट्रेन बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ठाणे स्थानकांवरील प्रवाशांनी तर एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना टॉयलेटची देखील सोय नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे प्रवासी किती त्रासातून जात आहेत हे स्पष्ट होत आहे. फक्त मध्य रेल्वेच नाही तर हार्बर रेल्वे सेवा देखील ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वे सेवेलादेखील त्याचा फटका बसला आहे.
मुंबई पाठोपाठ ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये धुवाँधार
फक्त मुंबईच नाही, तर ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. ठाण्यातील अनेक रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली शहरात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. परिणामी वालधूनी नदीचे पाणी हे कल्याणमध्ये शहरात शिरले आहेत. नदीकाठच्या घरांमध्ये कंबरेइतकं पाणी भरलं आहे. तसेच कुर्लाच्या एलबीएस रोडवरदेखील कंबरेइतके पाणी भरलं आहे. रायगड जिल्ह्यालाही प्रचंड पाऊस पडतोय. तसेच पालघर जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडतोय. वसई, विरार शहराला पावसाचा मोठा फटका बसलेला बघायला मिळतोय. तसेच पालघरमध्ये भातशेती पाण्याखाली गेली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा