• Thu. Jun 18th, 2026

    भाजपकडून एकाच वेळी ठाकरेंसह शिंदेंवरही कुरघोडी? महत्त्वाच्या बैठकीतून पालकमंत्र्यांचेच नाव वगळल्याने खळबळ

    भाजपकडून एकाच वेळी ठाकरेंसह शिंदेंवरही कुरघोडी? महत्त्वाच्या बैठकीतून पालकमंत्र्यांचेच नाव वगळल्याने खळबळ

    Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. कारण तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार आढावा बैठकीच्या अंतिम यादीतून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे वगळण्यात आली आहेत.

    भाजपकडून एकाच वेळी ठाकरेंसह शिंदेंवरही कुरघोडी?(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    धाराशिव: भारतीय जनता पार्टीचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी राजकीय डाव टाकून धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना शह दिला आहे. तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार आढावा बैठकीतून पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे वगळल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला जारी करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार या दोघांचेही नाव होते. मात्र, अंतिम यादी आली तेव्हा ही दोन्ही नावे वगळण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत होणार महत्वपूर्ण बैठक

    राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली 18 ऑगस्ट रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत आधी सरनाईक आणि निंबाळकर यांची नावे वगळण्यात आली. जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांची नावे वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. या वादानंतर मंत्रालयाकडून अधिकृत पत्र काढून धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. दोघांचीही नावे बैठकीसाठी समाविष्ट करण्यात आल्याने वाद निवळला होता. मात्र पुन्हा अचानक ऐन बैठकीच्या आदल्याच दिवशी पालकमंत्री आणि खासदार यांची नावे अंतिम यादीतून काढून टाकण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, महायुतीतीलच मंत्री प्रताप सरनाईक यांना डच्चू दिल्याने महायुतीतील वाद वाढल्याची चर्चा रंगू लागली आहे.

    Maharashtra Timesअजित पवार यांच्याकडून कंत्राटदारासह अधिकाऱ्यांची झाडाझडती, नेमकं काय घडलं?

    धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या महत्त्वाच्या बैठकीतच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनाच वगळल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्ती महत्त्वाच्या बैठकीच्या यादीतून दोनदा बाजूला करण्यामागील नेमके कारण काय? ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे त्या आशिष शेलारांवर नेमका कोणाचा दबाव आहे? याची चर्चा देखील जिल्हाभरात सुरू आहे. याचबरोबर, 18 ऑगस्ट रोजी 3 वाजता होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.

    अंतिम यादीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव प्रथम क्रमांकावर

    नवीन यादीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची नावे पूर्णपणे गायब झाली आहेत. आता या यादीत केवळ आमदार पाटील, प्रशासकीय अधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि पुजारी यांचाच समावेश आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर काय स्पष्टीकरण देण्यात येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा