Mumabi Dahi Handi : मुंबईमध्ये शनिवारी दोन मंडळांनी दहा थर लावत विश्वविक्रम केला. दोन्ही मंडळांनी नऊ थरांच्या अपयशाचा शिक्का पुसला आणि दहा थर लावत विक्रम रचला. विशेष म्हणजे जय जवान या पथकाने तर तीनवेळा दहा थर लावले.
वर्तकनगर येथे प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी उत्सवात पहिले १० थर रचत कोकणनगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद केली. त्यांना २५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. ‘यापूर्वी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी नऊ थरांचा विश्वविक्रम केला होता. ‘गोविंदा’ हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. १० थरांचा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे, तर संपूर्ण देशाची शान आहे. खेळाडूंनी आपल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जगभरात ठसा उमटवला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची परंपरा आम्ही पुढे नेली. आजचा हा क्षण तर अत्यंत गौरवाचा आहे’, असे सरनाईक यांनी याप्रसंगी नमूद केले. तर, ‘कोकणनगरच्या गोविंदांनी मेहनत, जिद्द आणि शिस्त यांची सांगड घालत हा महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवला आहे. मला विश्वास होता की कोकणनगर विश्वविक्रम रचेल. तो विश्वास सार्थ ठरला’, असे कौतुक संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केले.
मोठी बातमी! मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, मानखुर्दमध्ये गोविंदाचा मृत्यू
‘जय जवान’ची हॅटट्रिक
गिनीज बुकमध्ये नऊ थरांचा विक्रम नोंदवून आपली ताकद सिद्ध केलेल्या जोगेश्वरीच्या ‘जय जवान’ गोविंदा पथकाने यंदा तो विक्रमही मोडून काढला. घाटकोपर अमृत नगर येथे व ठाणे संस्कृती प्रतिष्ठानसह मनसे नेते अविनाश जाधव आयोजित दहीहंडीत ‘जय जवान’ने सलग तीनवेळा दहा थरांचा भव्य मानवी मनोरा रचून हॅटट्रिक केली.
ठाकरे बंधूंकडून एकजुटीने तयारी, आता BMC साठी फडणवीसांनीही शड्डू ठोकला; आव्हान देत म्हणाले…
‘खोपटच्या राजा’चे नऊ थर
सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव, खोपट विभाग, ठाणे गोविंदा पथकाने शनिवारी सर्वप्रथम कंसल मिल येथील भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या शारदा संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात नऊ थर रचले. गेल्यावर्षीदेखील या मंडळाने याठिकाणी ठाणे शहरातील पहिले नऊ थर रचणारे मंडळ ठरण्याचा मान पटकावला होता. यासोबतच माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प दहीहंडी उत्सवातही या पथकाने नऊ थर रचले होते. पुढच्या वर्षी १० थर रचण्याचा मानस मंडळाचे सल्लागार समीर पेंढारे यांनी व्यक्त केला.

