Mumbai Weather Update: मुंबईत शनिवारी विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, पुढील तीन दिवस महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याशिवाय, कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा येथेही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
शुक्रवारी रात्रीनंतर मुंबईमधील पावसाचा जोर अधिक वाढला. शुक्रवारी संध्याकाळी ५.३०पर्यंत सांताक्रूझ येथे केवळ १६.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सकाळी ८.३०पर्यंत २४४.७ मिलीमीटर पाऊस पडला. कुलाबा येथे शनिवारी सकाळी ८३.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मध्य मुंबईमध्ये या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे, तसेच पूर्व-पश्चिम द्रोणीय स्थितीही निर्माण झाली आहे. यामुळे अरबी समुद्रातून बाष्प खेचले जात असून, याचा परिणाम कोकण विभागावर दिसत असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. हा प्रभाव पुढील किमान तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र १८ ऑगस्टपर्यंत पश्चिम ते वायव्य पट्ट्यात प्रवास करून गुजरातपर्यंत पोहोचू शकते. १८ ऑगस्टपर्यंत त्याची तीव्रता कमी होऊन ही प्रणाली चक्रीय वातस्थिती होईल. त्याच वेळी बंगालच्या उपसागरात १८ ऑगस्टला आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. या प्रभावाखाली २१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे शनिवारी भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.
Maharashtra Weather : सावधान! पुढील चार दिवस धोक्याचे, राज्याच्या ‘या’ भागांत अतिवृष्टीचा इशारा; IMD कडून हाय अलर्ट
मुंबईत पश्चिम उपनगरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर सकाळच्या सुमारास मध्य मुंबईतही पावसाचा जोर होता. दुपारच्या सुमारास पाऊस काहीसा कमी झाला, मात्र संध्याकाळी पावसाला पुन्हा सुरुवात झाली. आज, रविवारसाठी संपूर्ण कोकण विभागाला ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरीला उद्या, सोमवारसाठी रेड ॲलर्ट असून, उर्वरित कोकण विभागाला ऑरेंज ॲलर्ट कायम आहे. या कालावधीत काही ठिकाणी अती मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे घाट विभागाला रविवार आणि सोमवारसाठी रेड ॲलर्ट आहे. कोल्हापूर घाट विभागाला रविवारी ऑरेंज, तर सोमवारी रेड ॲलर्ट देण्यात आला आहे. सातारा घाट विभागालाही रविवारी ऑरेंज, तर सोमवारी रेड ॲलर्ट देण्यात आला आहे. नाशिक घाट परिसरात रविवारी आणि सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, त्यानंतर मंगळवार आणि बुधवारसाठी ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.
मच्छिमारांसाठी इशारे
कोकण किनारपट्टीवर १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ५०-६० किमी/ताशी वाऱ्यासह समुद्रात खवळलेली स्थिती राहणार असून, मच्छिमारांनी या कालावधीत समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन संपर्क
मंत्रालयीन स्तरावरील राज्यस्तरीय आपत्कालीन कार्य केंद्र २४ तास सुरू आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षासाठी फोन क्र. ०२२-२२०२७९९० किंवा ०२२-२२७९४२२९ किंवा ०२२-२२०२३०३९ तसेच मोबाइल – ९३२१५८७१४३ उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

