Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसताना दिसतोय. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पण आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. असं असलं तरी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसांमुळे नद्यांना पूर येताना दिसतोय.
अमरावती जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. त्यामुळे या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तसेच मुसळधार पावसामुळे चांजूरबाजार ते सोनोरी या मार्गावरील पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे सोनेरी गावाचा संपर्क तुटला आहे. पुलावरुन पुराचं पाणी वाहून जात असताना देखील वाहनचालक जीव धोक्यात टाकून जाताना दिसत आहेत. वाहनचालकांच्या या धाडसामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं धाडस करु नका, असं आवाहन केलं जात आहे.
दुसरीकडे अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे जनजवीन विस्कळीत झालं आहे. माधान आणि सोनोरी गावात मुसळधार पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे गावातील घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे सुरक्षेसाठी नागरीक हे घरांच्या छतावर चढले आहेत. पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगाने वाहताना दिसतोय. पाण्याचा प्रवाह हा धडकी भरवणारा आहे. या घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढलं जात आहे.
नांदेडमध्ये मन्याड नदीला पूर
फक्त अमरावतीच नाही तर नांदेड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नांदेडच्या मन्याड नदीला पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे देगलूर तालुक्यातील वझरगा शिवारासह नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती आहे. मुसळधार पावसामुळे नांदेडमधील काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे. प्रशासनाकडून अडकलेल्या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
हिंगोलीतही मुसळधार पाऊस
हिंगोली जिल्ह्याला देखील मुसळधार पावसाचा फटका बसताना दिसतोय. सेनगाव तालुक्यातील आजेगाव जवळील ओझ्याला पूर आला आहे. यामुळे दोन्ही बाजूने नागरीक अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे ओढ्याला पूर आला आहे. त्यामुळे पुलावरुन पाणी वाहत आहे. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूने नागरीक अडकले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात तेरणा नदीला पूर
धाराशिव जिल्ह्यातली जोरदार पाऊस पडतोय. त्यामुळे तेरणा नदीला पूर आला आहे. भूम तालुक्यातील वंजारवाडी गावात नदीचं पाणी शिरलं आहे. तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे टेंभुर्णी-लातूर रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच मांजरा नदीला पूक आला आहे. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
सोलापूरमध्येदेखील मुसळधार पाऊस
सोलापूर जिल्ह्यातीलही मुसळधार पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे दीड एकर ऊस मातीसह वाहून गेला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संबंधित घटना ही दक्षिण सोलापूरच्या हत्तूर गावात घडली आहे. मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की दीड एकरातील ऊस मातीसह वाहून गेला.
लातूरच्या तरवजा नदीला पूर
लातूर जिल्ह्याला देखील पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय. लातूर जिल्ह्यातील तरवजा नदीला पूर आला आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नदीनाल्यांना पूर
वाशिम जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडला आहे. रिसोड तालुक्यात आज झालेल्या पावसामुळे अनेक भागांत नदी-नाल्यांना पूर आला. परिणामी शेतांमध्ये पाणी साचून शेतीला तलावाचे रूप आले. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे शेती खरडून गेली आहे. तर अनेक मार्ग बंद पडले आहेत. कारंजा तालुक्यातील धनज बु. ते भवरी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग बंद झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेलू-खडसे परिसरात अवघ्या तासभरात झालेल्या जोरदार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान, रिसोड तालुक्यातील गोहोगाव-हाडे परिसरातही मुसळधार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पूर आला. या पुराच्यापाण्यामुळे वाकद–गोहोगाव हा रस्ता काही वेळ बंद होता. त्यामुळे वाहतुकीत खोळंबा निर्माण झाला होता.

