• Sat. Mar 7th, 2026
    अलिकडच्या काळातल्या निवडणुका खूप संशयास्पद; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा आरोप

    Balasaheb Thorat Nashik: जागतिक आदिवासी दिनानिमित्त शनिवारी (दि.९) रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान माध्यमांशी बोलताना थोरात यांनी निवडणुकीतील गैरप्रकारांच्या आरोपांना दुजोरा दिला.

    balasaheb thorat news (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: अलिकडच्या काळातील निवडणुका खूप संशयास्पद होत असून, अनेक शंका आजही निर्माण होत आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे मांडले त्याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकले नाही. हरियाणा पुन्हा भाजपकडे जाते, हे कसे होऊ शकते? शंका घेण्यासाठी अनेक जागा आहेत, शंकांचे निरसन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. मात्र निवडणूक आयोग उत्तर देऊ शकत नाही, असा आरोप माजी मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. शरद पवार यांना भेटणारे ‘ईव्हीएम हॅक’ करणारे असावेत असे सांगत, शिर्डी व संगमनेर मतदारसंघांबाबत हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झाल्याचा आरोपही थोरात यांनी केला.

    थोरात म्हणाले, ‘शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे असे काही एजंटच फिरत असतील, तर ‘ईव्हीएम’संदर्भातही प्रश्न निर्माण होतो. मतदानावर लोकशाही चालते, त्या मतदानावरच शंका निर्माण होत असेल, तर ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. अत्यंत निरपेक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणे, अत्यंत गरजेचे आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करीत आहे, ही शंका सर्व जनतेच्या मनात आहे. निवडणूक आयोगाने आधीच डिजिटल स्वरूपात राहुल गांधींना माहिती दिली असती तर अनेक चोऱ्या लवकर समोर आल्या असत्या. निवडणूक आयोगानेच लोकशाहीचा खात्मा करायचा ठरवले आहे. त्यामुळे भविष्यात जनतेने हा विषय हातात घेणे गरजेचे आहे.’
    घोटीत धावत्या रेल्वेखाली दाम्पत्याने संपवलं जीवन, घटनेनं एकच खळबळ, का घेतला टोकाचा निर्णय?
    ‘अर्थव्यवस्था डबघाईला’
    ‘सिंहस्थासाठी निधी मिळत नाही, याचा अर्थ राज्याची अर्थव्यवस्था डबघाईला गेलेली आहे, ही वस्तुस्थिती आता नाकारता येत नाही. एक लाख ३० हजार कोटींचे निरनिराळ्या योजनांचे देणे आहे. ठेकेदार आत्महत्या करीत आहेत. संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना निराधारांसाठी आहेत. त्यांना आठ महिन्यांत पैसे मिळाले नाहीत,’असा आरोपही त्यांनी केला.
    सोलापुरात विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह मजुराचा मृत्यू; दोन जण थोडक्यात बचावले, घटनेनं हळहळ
    ‘शिर्डी, संगमनेरमध्येही घोटाळा’

    ‘माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाशी संबध आहेत. असे असतानाही माझा पराभव होतो, हे आश्चर्यकारक आहे. माझ्या मतदारसंघात अनेक ठिकाणी खोटे मतदान नोंदवले गेले. परंतु,आयोगाने त्याची दखल घेतली नाही. शिर्डी विधानसभा मतदारसंघात असाच मतदार नोंदणी घोटाळा झाला. संगमनेर मतदारसंघाबाबत निवडणूक आयोगाकडे मागितलेली माहिती दिली नाही,’ असा आरोप त्यांनी केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा