Sharad Pawar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शरद पवारांनी या भूमिकेला पाठिंबा देत आमचा आक्षेप मुख्यमंत्र्यांवर नाही, तो निवडणूक आयोगावर आहे. त्यामुळे उत्तरही आयोगाने द्यावं, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदार याद्यांतील घोळांवर केलेल्या भाष्यावरही शरद पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, “आमचा आक्षेप मुख्यमंत्र्यांवर नाही, तो निवडणूक आयोगावर आहे. त्यामुळे उत्तरही आयोगाने द्यावे. भाजप किंवा मुख्यमंत्री यामध्ये पडण्याची गरज नाही,” तसेच उद्धव ठाकरे दिल्लीतील एका कार्यक्रमात मागे बसले होते, यावर प्रश्न विचारले असता शरद पवार यांनी या चर्चेला महत्वहीन म्हटले आहे. “पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन चांगले दिसावे म्हणून आम्ही मागच्या सीटवर बसलो. आमच्या शेजारी कर्नाटकचे मुख्यमंत्रीही होते. पण त्यावरून वाद निर्माण करणे निरर्थक आहे,” असेही ते म्हणाले.
Sharad Pawar : ‘विधानसभेच्या १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो, ते दोघे…’; शरद पवार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या काळात दिल्लीमध्ये दोन व्यक्ती त्यांना भेटले होते. “महाराष्ट्राच्या २८८ जागांपैकी १६० जागा जिंकून देण्याची हमी आम्ही देऊ,” असा दावा त्यांनी केला होता. “तेव्हा माझ्या मनात निवडणूक आयोगाबद्दल शंका नव्हती, त्यामुळे त्याकडे मी दुर्लक्ष केले. पण नंतर हे लोक राहुल गांधींना भेटले आणि आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडले,” असे पवार म्हणाले. राहुल गांधी यांनी नंतर बोगस मतदानासंदर्भातील उदाहरणे आणि त्यांचे पुरावे सार्वजनिक केले. “हे फक्त आरोप नव्हते, तर अभ्यासपूर्ण सादरीकरण होते,” असे पवार यांनी सांगितले. पवारांनी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिलेल्या चर्चेच्या निमंत्रणावर अट घालण्यावरही टीका केली. “आयोगाने राहुल गांधींना बोलावले, पण त्यासाठी शपथपत्र देण्याची अट ठेवली. राहुल गांधी आधीच संसद सदस्य म्हणून शपथ घेतलेले आहेत. मग पुन्हा शपथपत्राची गरज काय? आयोग ही स्वतंत्र संस्था आहे, पण अशा पद्धतीने वागणे योग्य नाही,” असेही पवार म्हणाले. तसेच राहुल गांधींच्या प्रेझेंटेशननंतर देशातील लोकशाही प्रक्रियेवर नागरिकांमध्ये शंका निर्माण होऊ नये, यासाठी चौकशीची गरज असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. “सत्य काय आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. जर राहुल गांधींची माहिती चुकीची असेल, तर ते देशाला सांगितले पाहिजे. पण जर ती खरी असेल, तर निवडणूक प्रक्रियेतील त्रुटी दुरुस्त केल्या पाहिजेत. असेही शरद पवार म्हणाले.
