Vasai Crime: मोबाईल चोरीचा आळ घेतल्याने हॉटेल मालकाला निर्घृणपणे संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली.
नेमकं काय घडलं?
मयत अजित यादव याचा ‘यादव हॉटेल’ नावाचा एक ढाबा मालजीपाडा परिसरात आहे. शनिवारी रात्री यादवच्या हॉटेलमध्ये पूर्वी काम करणारा लल्ला अमर सिंग आपल्या मित्रांसह आला होता. रात्री सर्वांनी मुक्काम केला. यावेळी हॉटेलमधील काही जणांचे मोबाइल चोरीला गेले. त्या चोरीचा आळ यादव याने लल्ला सिंग आणि त्याच्या मित्रांवर केला. त्यातून दोघांमध्ये वाद झाला.
रागाच्या भरात कानाखाली मारलेली…
रागाच्या भरात यादव याने लल्ला सिंग याला कानाखाली मारले होते. लल्ला सिंग तिथून आपल्या मित्रांसह निघून गेला. मात्र रविवारी संध्याकाळी तो पुन्हा आपल्या मित्रांसह हॉटेलवर आला. सर्वांनी अजित यादव यांच्यावर अचानक हल्ला चढवला.या झटापटीत हॉटेलमधील कर्मचारी कपिल रामसुरत यादव यालाही बेदम मारहाण करण्यात आली.
लल्ला सिंगने डोक्यावर लाकडी दांडक्याने वार केले, तर शिवम यादव आणि महेश यादव याने डोक्यावर खुर्ची फेकली. जीव वाचवण्यासाठी अजित यादव पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना भोला यादव आणि राजन मौर्य यांनी त्याला बाहेर पकडून जमिनीवर आपटले. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. अजित यादव आणि कपिल यादव यांना गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी सकाळी उपचारादरम्यान अजित यादव याचा मृत्यू झाला. नायगाव पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. फरार झालेल्या सातही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

