• Fri. Mar 13th, 2026
    मराठा समाजाची लग्नासाठी 20 कलमी आचारसंहिता, संत-महंताच्या उपस्थितीत घेतली शपथ

    मराठा समाजाने लग्नाासाठी 20 कलमी आचारसंहिता तयार केली आहे. आज संत महंताच्या उपस्थितीत शपथ पार पडली आहे. या आचारसंहितेद्वारे समाज अनेक चुकीच्या गोष्टींना पायबंद घालत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    विजयसिंह होलम, अहिल्यानगर : मराठा समाजाने लग्न ात वारेमाप खर्च टाळावा, प्री वेंडिंग शूट, डीजे, हुंडा, सत्कार, भाषणे यांना फाटा द्यावा. लग्नानंतर मुलीच्या आईने सतत फोन करून मुलीच्या संसारातील हस्तक्षेप टाळावा.अशा मुद्द्यांचा समावेश असलेली 20 कलमी मराठा लग्न आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. अहिल्यानगरमध्ये झालेल्या कार्यक्रमात संत-महंत आणि समाजाच्या विविध घटकांच्या उपस्थिती या आचारसंहितेची शपथ देण्यात आली.

    नियम काय?
    लग्न सोहळा ३०० ते ५०० लोकांच्या उपस्थित व्हावा, प्री-वेडिंग प्रकार बंद करावा. केलाच तर तो लग्न सोहळ्यात जाहीर दाखवू नये, लग्न वेळेवरच लावावे. लग्नात डीजे नको. पारंपरिक वाद्य, लोक कलावंतांना संधी द्या. कर्ज काढून लग्नात खर्च करू नये. नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना पायबंद घालावा. वरमाला घालताना नवरा-नवरीला उचलू नये, लग्नात फक्त वधूपिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत. पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावेत. लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात, पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावेत. लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नयेत. देखावा करू नये. असे नियम करण्यात आले आहेत.

    त्याविरोधात समाज एकवटला
    पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मराठा समजाताली उधळपट्टी आणि चुकीच्या प्रथा पडत असलेले विवाह सोहळे चर्चेत आले होते. त्याविरोधात समाज एकवटला असून विवाह सोहळ्यांसाठी ठिकठिकाणी आचारसंहिता तयार करण्यात येत आहे. या अनुषंगाने अहिल्यानगर येथे रविवारी मराठा लग्न आचारसंहिता संमेलन भरवण्यात आले होते. यावेळी डोंगरगणचे जंगले महाराज शास्त्री, देवगडचे भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, उद्योजक एन. बी. धुमाळ, माजी आमदार साहेबराव दरेकर, किशोर मरकड, अशोक कुटे यांच्यासह मराठा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    हेतू ओळखा
    जुन्या चांगल्या प्रथा-परंपरा पुढे सुरू ठेवल्या पाहिजेत. मात्र, काही घटक चुकीच्या प्रथा आपल्या लग्न समारंभात घुसवू पहात आहेत. त्यांचा यामागील हेतू ओळखून मराठा समाजाने आपली आचारसंहिता ठरवून ती पाळली पाहिजे. असे ह.भ.प. जंगले शास्त्री महाराज म्हणाले.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब,महाराष्ट्र टाइम्स मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस. साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.… आणखी वाचा