Ajit Pawar NCP Politics : रमीचा डाव खेळल्याने वादात सापडल्याने माणिकराव कोकाटेंचे खातेपालट करण्यात आले. यानंतर दत्तात्रय भरणेंना कृषीमंत्रिपदाचा पदभार देण्यात आला. यामध्ये अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जाते.
काल माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीमंत्री पद काढून घेऊन त्यांना क्रीडा मंत्रीपद देण्यात आले आणि दत्तात्रय भरणे व कोकाटे यांच्या खात्यांची अदलाबदल करण्यात आली. अर्थात कृषिमंत्री पद मिळाल्याने दत्तात्रय भरणे यांच्यासाठी ही लॉटरीच मानली जात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. अचानक दत्तात्रय भरणे हे राज्याच्या चौथ्या स्थानावर आल्याने त्यांचे कार्यकर्ते खुश झाले आहेत.
काहीही न मिळता व काहीही न करता बारामतीकर भरपूर देतात. असे दत्तात्रय भरणे काही दिवसांपूर्वी बोलले होते. त्याची प्रचिती त्यांना यानिमित्ताने आली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय कार्यकर्तेच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत त्यांना अनेक पदे अशाच प्रकारे अचानकपणे मिळालेली आहेत. कोणतीही शक्यता नसताना त्यांच्या वाट्याला कृषी मंत्रीपद आल्याने ही चर्चा आणखीच वाढली आहे. कारण दत्तात्रय भरणे हे छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर संचालक म्हणून निवडून गेले. तिथे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले, त्यानंतर जिल्हा बँकेवर संचालक म्हणून निवडले गेले. तिथेही ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले, जिल्हा परिषदेवर ते सदस्य म्हणून निवडून गेले. आणि त्याही ठिकाणी ते अध्यक्ष झाले. व ते आता कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

