राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. फडणवीस यांनी डांगे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर फडणवीसांनी सूचक उत्तर दिलं. कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाचे संकेतही त्यांनी दिले. प्रदेशाध्यक्ष योग्य निर्णय घेत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
सांगलीतून अजून काही पक्ष प्रवेश होतील का? अपेक्षित आहेत?, असे प्रश्न एका पत्रकारानं मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले. त्यावर तुम्हाला अपेक्षित असलेला प्रवेश आमच्या मनात सध्या तरी नाही, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांनी पाटील यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल अप्रत्यक्षपणे विचारण्यात आलेला प्रश्न पद्धतशीर टोलावला आणि त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. अनेकांनी तर टाळ्यांचा कडकडाट केला.
जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्यालदेखील भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दलही फडणवीस यांना विचारण्यात आलं. ‘पक्ष प्रवेशाबद्दलचा निर्णय आमचे प्रदेशाध्यक्ष घेत असतात. त्यांनी घेतलेले निर्णय आम्हाला मान्य असतात. कैलास गोरंट्याल जालन्यातली महत्त्वाचे नेते आहेत. ते अनेक वर्षे आमदार राहिलेले आहेत. जमिनीशी नाळ घट्ट असलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. अशा नेत्यांना प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश देत आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो,’ असे कौतुकोद्गार फडणवीस यांनी काढले.

