CM to BJP Workers: वर्ध्यात विभागीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीत एकजूट राहण्याचा सल्ला दिला. विदर्भातील सिंचन प्रकल्पांवर भर दिला जाईल, असे ते म्हणाले. ‘बेघरमुक्त महाराष्ट्र’ हे सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील चरखा सभागृहात सोमवारी भाजपची विभागीय बैठक झाली. यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, पालकमंत्री पंकज भोयर, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार समीर कुणावार, आमदार सुमित वानखेडे, आमदार प्रतापराव अडसड, आमदार प्रवीण दटके, आमदार संजय कुटे आदी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात विरोध, विद्यार्थ्यांकडून जोरदार निदर्शने
मुख्यमंत्री म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तीन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागले पाहिजे. सर्व रचना निवडणुकीपर्यंत तयार करायची आहे. आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी तुमची आहे. लोकांची अनुकूलता महत्वाची आहे. मतदार यादीकडे आधीपासूनच लक्ष घातले पाहिजे. पक्षात जिल्हा पातळीवर लहान-मोठे वाद आहेत. कार्यकर्त्यांसोबत नेतेही अपवाद नाहीत. हे वाद टाळून निवडणुकीच्या तोंडावर सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘दुष्काळ इतिहासजमा होईल’
बळीराजा योजनेमुळे विदर्भातील जवळपास १२० प्रकल्प पूर्णत्वास आणले आहे. मोठी गुंतवणूक सिंचनात केली. वैनगंगा-नळगंगा सारखा प्रकल्प हाती घेतलेला आहे. ९० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प विदर्भाचे चित्र बदलणारा आहे. त्याचा संपूर्ण आराखडा अंतिम टप्प्यात आणला आहे. विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये मोठे नेटवर्क उभे राहणार आहे. विदर्भातील दुष्काळ आता इतिहासजमा होईल. अकराही जिल्ह्यांत नानाजी देशमुख कृषी प्रकल्प राबविला जात आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढविल्याशिवाय विकास होत नाही. शंभर टक्के पांदण रस्ते पूर्ण करायचे आहेत. त्याच्या गुणवत्तेवर भर राहणार आहे. हजार लोकसंख्येच्या प्रत्येक गावात सिमेंट रस्ता जाण्याची योजना आखली आहे. त्यासाठी मोठी गुंतवणूक केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
हिंदी-मराठी वादात राज्यपालांची उडी, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले….
‘वीज दरवाढीविरुद्ध आंदोलन होणार नाही’
पंतप्रधान आवास योजनेतील २०१७मधील सर्वेक्षण यादीनुसार महाराष्ट्रात ३० लाख घरांची आवश्यकता होती. त्यासाठी केंद्राने निधी मंजूर केला आहे. विशेष म्हणजे या घरावर सोलर व्यवस्था करून दिली जाणार आहे. ‘बेघरमुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेकडे आपण वेगाने निघालो आहे. दिवसा बारा तास वीज देण्यासाठी मुख्यमंत्री सौर वाहिनी सुरू केली. आता ३६५ दिवस शेतात वीज मिळेल. दरवर्षी विजेचे दर नऊ टक्क्यांनी वाढतात. पण, आता नवे दर ‘एमईआरसी’कडून मंजूर करून घेतल्याने विजेचे दर स्थिर राहणार आहेत. त्यामुळे विरोधकांना वीज दरवाढीच्या विरोधात आंदोलन करता येणार नाही, असा दावाही फडणवीस यांनी केला.
