• Mon. Mar 16th, 2026
    मंत्री शिरसाटांच्या पत्राला माधुरी मिसाळांचे पत्रानेच प्रत्युत्तर; म्हणाल्या, ‘राज्यमंत्री म्हणून मला अधिकार…’

    Madhuri Misal Wrote Answer to Sanjay Shirsat : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र लिहिले आणि मिसाळ यांनी विभागाच्या परस्पर बैठका घेतल्याचा दावा केला आणि पत्रातून नाराजी व्यक्त केली. यावर आता मिसाळ यांनीही पत्रातूनच प्रत्युत्तर दिले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे महायुतीत अंतर्गत वाद असल्याचे समोर येत आहे. महायुतीतील अनेक मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचे वृत्त आहे. यातच आणखी एक वाद समोर आला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना खरमरीत पत्र लिहिले. यातून शिरसाटांनी माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय विभागाच्या परस्पर बैठका घेतल्याचा दावा केला आणि पत्रातून नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले. यावर आता माधुरी मिसाळ यांनीही शिरसाटांच्या पत्राला पत्रानेच उत्तर दिले आहे.

    माधुरी मिसाळ म्हणाल्या, ‘मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या निर्देशानुसार सामाजिक न्याय खात्याच्या बैठका घेतल्या आहेत. या खात्याची मंत्री असल्याने मला बैठकीसाठी कोणाच्या पूर्वपरवानगीची गरज नाही. कॅबिनेट मंत्र्यांच्या कुठल्याही कामात ढवळाढवळ केलेली नाही. लोकप्रतिनिधी म्हणूनच बैठक घेतली आहे.’ यावरुन आता महायुतीतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा दोन मंत्री विभागीय कामकाजावरुन आमनेसामने आल्याचे चित्र आहे.

    संजय शिरसाटांनी पत्रात काय लिहिले?

    संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांनी परस्पर सामाजिक न्याय खात्याची बैठक घेतल्याचा दावा करत पत्रातून नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘यापुढे बैठका घ्यायच्या असतील तर माझ्या अध्यक्षतेखाली घ्या.’

    माधुरी मिसाळ यांचे पत्रानेच प्रत्युत्तर

    सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे. सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही. सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजा संदर्भात मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विषयांचे वाटप करण्यात आले आहे. वाटप केलेल्या अनेक अधिकारांबद्दल मागील काही वर्षात विभागाने केलेल्या कार्यवाहीबद्दल विभागात माहिती सुद्धा उपलब्ध नाही, असे असताना याबाबत कोणतीही नाराजी व तक्रार व्यक्त न करता विभागाची राज्यमंत्री म्हणून मी कामकाज करत आहे. पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विधिमत घेण्यात येत आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा