Raigad Rain News : रायगडात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरु आहे. यातच संपूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे भेरव गावाजवळील खुरावले फाटा येथील अंबा नदीवरील पुलावरुन सकाळी ओसंडून पाणी वाहत होते. या पाण्यातून वाहनचालक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत.
सकाळी १० वाजेच्या सुमारास भेरव पुलावरून पाणी गेल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या पुलाच्या पलीकडून पाली व खोपोलीला जोडणारा रस्ता आहे. तसेच दुसऱ्या बाजूने भेरव, वाघोशी, महागाव व पेण आदी गावांकडे जाणारा रस्ता आहे. मात्र बराच वेळ वाट पाहून देखील पुलावरचे पाणी कमी होत नसल्याने तेथील अतिउत्साही वाहन चालकांनी आपली वाहने वाहत्या पाण्यातून नेण्याचा धोकादायक स्टंट केला आहे.
Maharashtra Weather : पुढील चार दिवस राज्यभरात धो-धो! ‘या’ भागांत अतिवृष्टीची शक्यता, रेड अलर्ट जारी
पाण्याचा प्रवाह व जोर वाढला असता तर वाहनचालकांच्या जीवावर बेतले असते. खुरावले फाटा येथील पुलावरून पावसाळ्यात नेहमी पाणी जात असते. येथील प्रवासी असुरक्षितणे प्रवास करीत असतात. त्यामुळे हा पूल धोकादायक ठरत आहे.
पुलावरून पाणी जात असताना पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस किंवा होमगार्ड तैनात करण्यात यावे, तसेच वाहतूक थांबवण्यात यावी. तसेच पुलाची उंची तरी वाढवण्यात यावी जेणेकरुन प्रवास सुकर होईल, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरु आहे. किनारपट्टी भागात पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आला. जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूर आला असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. पुढील काही दिवस जिल्ह्यातील पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

