• Sat. Mar 7th, 2026
    जगतापांनी पक्षात माणसं पेरलेत, आधी त्यांची हकालपट्टी करा; काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा

    Pune Congress Meeting : पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठक घेत वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता जिल्हा काँग्रेसमध्ये नवा गोंधळ निर्माण झाला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    अभिजीत दराडे, पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. रवींद्र धंगेकर, संग्राम थोपटे आणि संजय जगताप या माजी आमदारांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. काँग्रेसला लागलेल्या गळती नंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठक घेत वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता जिल्हा काँग्रेसमध्ये नवा गोंधळ निर्माण झाला असून जिल्हा काँग्रेसची पूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्याची मागणी केली जात आहे.

    नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी काँग्रेसमधून राजीनामा देण्याआधी स्वतःच्या मर्जीतील कार्याध्यक्ष आणि पदाधिकारी कोणालाही विश्वासात न घेता नेमले आहेत, असा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे ही पूर्ण कार्यकारणी बरखास्त करा, अशी मागणी केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेस बैठकीत त्याच पदाधिकाऱ्यांनी आता पक्ष सोडून गेलेल्या नेत्यावर टीका करू नका, अशी भूमिका घेतल्यामुळे अभूतपूर्व गोंधळ झाल्याची माहिती आहे. हे पदाधिकारी अजूनही पक्षाच्या नव्हे तर गेलेल्या नेत्याच्या प्रभावाखाली कार्यरत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याची टीका काँग्रेसच्याच नेत्यांनी केली आहे.
    भाजप मतदारांची चोरी करुन सत्तेत बसलेला पक्ष, कार्यकर्ते नाहीत म्हणून…, हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका
    २० तारखेला काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची एक बैठक पार पडली. या बैठकीत संजय जगताप यांनी नियुक्त केलेली कार्यकारणी तात्काळ बरखास्त करा आणि निष्ठावंतांना संधी द्या, यातून पक्ष वाचवेल अशी भूमिका काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

    संजय जगताप यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमात “मी काही लोकांना मुद्दाम काँग्रेसमध्ये ठेवले असून, ते माझे निष्ठावान आहेत, पक्षाचे नाही. ते वेळ आली की माझ्या सोबत परततील”. असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीमध्ये याचा उद्रेक पाहायला मिळाला.

    या पार्श्वभूमीवर, कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अलीकडे आयोजित केलेल्या बैठकीत सध्याची पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी तात्काळ बरखास्त करण्यात यावी. नवीन कार्यकारिणी ही फक्त अशा निष्ठावान, विचारशील आणि संकटकाळातही काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांनीच तयार व्हावी. आज पक्ष वाचवायचा असेल, तर त्याच्या विचारसरणीशी खरी निष्ठा असलेल्यांनाच पुढे आणणं गरजेचं आहे. कारण सत्ता मिळवणं हा अंतिम हेतू नसून, जनतेसाठी लढण्याची जाज्वल्य जाणीव हाच काँग्रेसचा आत्मा आहे. अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये गृहकलह सुरू झाला असून त्याची झलक ही काल झालेल्या बैठकीत पाहायला मिळाली.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा