Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. त्यातच, संजय राऊत यांनी ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. लवकरच मोठे बदल होतील, असा दावा त्यांनी केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये काहीतरी वेगळं आणि नवं सूचवू पाहत आहेत. त्यांनी राज्याच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खरंतर संसदेचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने संजय राऊत दिल्लीला गेले आहेत. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये आपण दिल्लीत असल्याचा देखील उल्लेख केला आहे. पण या व्यतिरिक्त त्यांनी महाराष्ट्रात लवकरच वेगवान घडामोडी सुरु होतील, असं भाकीत वर्तवलं आहे.
संजय राऊत यांचं ट्विट काय?
“फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी! मी दिल्लीत आहे; चार मंत्री नक्की घरी जात आहेत; पाचवा गटांगळ्या खात आहे. मिंधे, अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला! महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. जय राऊत यांच्या ट्विटचा नेमका अर्थ काय असेल? याबाबत राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं आहे. पण त्यांच्या ट्विटचं टायमिंग महत्त्वाचं आहे.
फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी!मी दिल्लीत आहे;चार मंत्री नक्की घरी जात आहेत;पाचवा गटांगळ्या खात आहे.मिंधे अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला!महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील!@AmitShah @PMOIndia @Dev_Fadnavis pic.twitter.com/C0rZ0fI6aE
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2025
देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा
संजय राऊत यांच्या ट्विटचा काय अर्थ निघतो? याचा अंदाज सध्या लावणं कठीण आहे. पण नुकतंच राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती. तर उद्धव ठाकरेंनी त्यावर खेळीमेळीने विधान परिषदेचं कामकाज सुरु होतं, अशी प्रतिक्रिया त्यावर दिली होती. यानंतर शनिवारी रात्री आमदार आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा आहे. या चर्चांनंतर आता संजय राऊत यांचं ट्विट आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील आगामी घडामोडींबाबत सस्पेन्स वाढला आहे.

