Ambadas Danve : गेल्या तीन वर्षांपासून शिवसेनेत फूट पडली आहे. शिवसेना दोन पक्षात विभागली गेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सत्तेत आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना ही विरोधात आहे. एकनाथ शिंदे यांचा कल हा पक्ष संघटना मजबूत करण्याकडे आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेना कामाला लागल्या आहेत. असं असलं तरी शिवसेना फुटीची सल ही आपल्या मनाला कायम टोचत असून दोन्ही शिवसेना या एकत्र येतील अशी आशा असल्याचं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
अंबादास दानवे यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत संबंधित वक्तव्य केलं आहे. अंबादास दानवे यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न अंबादास दानवे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येतील अशी आशा आहे, असं मोठं वक्तव्य केलं आहे.
अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?
“मी तेवढा मोठा नाहीय. पण निश्चित मी त्यादिवशी सुरुवातीलाच म्हटलं की, मनाला वेदना झाल्या. जी संघटना अखंड ताकदवान होती, ठीक आहे, सत्तेत बसणं वगैरे, आम्ही काय सत्तेसाठी जन्माला आलेलो नाहीत. सत्ता येईल आणि जाईल. पण जी संघटना फुटली त्याच्या वेदना मनाला आणि हृदयाला झालेल्याच होत्या. या वेदना कधीना कधी भरुन निघाव्यात असं मनाला वाटत असतं. सगळे एकत्र असले पाहिजे. सगळे लोकं असले पाहिजेत. कारण आपल्या शिवसेनेचं राज्य असलं पाहिजे. आपली महाराष्ट्रात ताकद असली पाहिजे, असं मला शिवसैनिक म्हणून वाटतंच. आशा ठेवायला काही हरकत नाही”, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.
“मी कुणाविषयी वैयक्तिक सल ठेवणार नाही. पण मनाला ही सल कायम आहे की, आपली एवढी मजबूत संघटना कुणीतरी फोडली. तिला कुणाची तरी दृष्ट लागली. संघटना तेवढीच मजबूत व्हावी हीच माझी इच्छा आहे”, असं अंबादास दानवे म्हणाले.

