• Mon. Jun 15th, 2026

    ठाकरे बंधू वेगळे लढले तर…; फटका कोणाला? फायदा कोणाचा? सर्व्हेतून इंटरेस्टिंग आकडे समोर

    ठाकरे बंधू वेगळे लढले तर…; फटका कोणाला? फायदा कोणाचा? सर्व्हेतून इंटरेस्टिंग आकडे समोर

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची शक्यता आहे. युती झाल्यास, शिवसेना (उबाठा) आणि मनसेला १०० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंच्या पक्षांना जोरदार दणका बसला. उद्धव ठाकरे ंच्या पक्षाला केवळ २० जागांवर यश मिळालं. तर राज ठाकरे ंच्या मनसेला भोपळाही फोडता आला नाही. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरेदेखील पराभूत झाले. त्यानंतर ठाकरे ब्रँड संकटात सापडल्याची चर्चा सुरु झाली. ठाकरेंच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ५ जुलैला मुंबईत विजयी मेळाव्यात एकत्र आले. उद्धव ठाकरेंनी राज यांच्यासोबत युती करण्याची तयारी जाहीरपणे दर्शवलेली आहे. पण राज यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.

    राज ठाकरेंच्या मनसे सोबत युती करुन मुंबई महापालिकेतील सत्ता कायम राखण्याच्या प्रयत्नात उद्धवसेना आहे. त्यामुळे मनसे सोबत युती करण्यासंदर्भात उद्धवसेना अधिक सकारात्मक आहे. या संदर्भात उद्धवसेनेकडून एक सर्वेक्षण करण्यात आलं आहे. दोन्ही ठाकरे सोबत आल्यास मुंबई महापालिकेत काय चित्र असू शकेल, याचा अंदाज उद्धवसेनेकडून घेण्यात आलेला आहे.

    २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं ८४ जागा जिंकल्या. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. २०१७ मध्ये नगरसेवक झालेल्या निम्म्याहून अधिकांनी गेल्या तीन वर्षांत उद्धव यांची साथ सोडत शिंदेसेनेची वाट धरलेली आहे. भाजपनंही मुंबईत ताकद वाढवली आहे. ठाकरेंचा पक्ष सत्तेत नसल्यानं आव्हान मोठं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पक्षाशी युती केल्यास काय होईल, याचा आढावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्वेक्षणातून घेण्यात आला आहे.

    मुंबईत ५ जुलैला झालेल्या विजयी मेळाव्यानंतर शिवसेना उबाठानंतर सर्व्हे केला गेला. त्यानुसार ठाकरे बंधूंची युती झाल्यास त्यांना १०० पेक्षा अधिक जागा मिळतील. विशेष म्हणजे मनसेला २५ हून अधिक जागांवर विजय मिळेल. २०१७ मध्ये मनसेला ७ जागा मिळाल्या होत्या. त्याआधी २०१२ मध्ये मनसेनं २८ जागा जिंकल्या होत्या. मुंबईत हीच मनसेची सर्वोत्तम कामगिरी आहे. युती झाल्यास राज ठाकरे सर्वोच्च कामगिरी पुन्हा नोंदवू शकतात.

    २०१७ मध्ये शिवसेनेला ८४ जागा जिंकता आल्या होत्या. गेल्या ८ वर्षांत ठाकरेंच्या शिवसेनेला अनेक मोठे धक्के बसले आहेत. आता युती न झाल्यास उद्धव यांच्या पक्षाला ६५ जागांवर समाधान मानावं लागेल. तर राज यांच्या मनसेला केवळ १० जागा मिळतील. याचा अर्थ दोघांचे मिळून ७५ उमेदवार निवडून येतील. पण युती झालीच तर दोघांच्या जागा १०० च्या वर जातील. याचा अर्थ युती दोघांसाठी फायद्याची असेल. दोघे स्वतंत्र लढल्यास त्याचा फायदा महायुतीला होईल. २०१२ मध्ये मुंबईत भाजपनं ३१ जागा जिंकल्या. २०१७ मध्ये त्यांनी थेट ८२ वर भरारी घेतली. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप किती जागा जिंकणार याची उत्सुकता आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा