• Wed. Mar 18th, 2026
    दादा, एवढा लेट झालाय, सकाळी जा; नातेवाईकांचा आग्रह मोडला, कार नाल्यात कोसळून सात जणांचा दुर्दैवी अंत

    Nashik Family Death in Car Accident : खड्ड्यात पावसामुळे पाणी साचलेले असल्याने कुणालाही कारचा दरवाजा उघडता आला नाही. क्रेनद्वारे कार डबक्यातून बाहेर काढली, तोपर्यंत नाकातोंडात पाणी गेल्याने कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला.

    नाशिक कार अपघात (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    नाशिक : नाशिक येथे नातीचा वाढदिवस थाटात साजरा करून अल्टो कारने घरी परतणाऱ्या नऊ जणांच्या कुटुंबावर बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास काळाने झडप घातली. कार व दुचाकीच्या अपघातात कार खड्ड्यात उलटल्याने नाकातोंडात पाणी गेल्याने 7 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी आहेत.

    मृतांमध्ये २ वर्षीय बालक व 3 महिलांचा समावेश आहे. सर्व मृत दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे, देवठाण, सारसाळे येथील रहिवासी आहेत. वणी मार्गाच्या वळणावर हा अपघात झाला.

    दत्तात्रेय नामदेव वाघमारे, वय 45, अनुसया दत्तात्रेय वाघमारे, वय 40, दोघेही रा. देवपूर, देवठाण ता. दिंडोरी; देविदास पंडित गांगोडे, वय 28, मनीषा देविदास गांगोडे, वय 23, भावेश देविदास गांगोडे, वय 2, रा. सारसाळे, ता. दिंडोरी; उत्तम एकनाथ जाधव, वय 42, अलका उत्तम जाधव, वय 38, रा. कोशिंबे ता. दिंडोरी, अशी मृतांची नावे आहेत.

    नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथील दत्तात्रेय पंडित वाघमारे, त्यांच्या पत्नी अनुसयासह नाशिक येथे मोठ्या मुलीच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्टो कारने (एमएच 04 डीवाय 6642) गेले होते. त्यांच्यासोबत सारसाळे येथील मुलगी मनीषा गांगोडे, जावई देविदास गांगोडे, दोन वर्षांचा नातू भावेश तसेच मित्र उत्तम जाधव आणि त्यांच्या पत्नी अलका होते. वाढदिवस कार्यक्रमात जेवण आटोपून सर्वजण बुधवारी रात्री गावाकडे निघाले. दिंडोरीनंतर वणी रस्त्यावरील वळणावर समोरून येणाऱ्या कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अल्टो कारचे पुढील टायर फुटून कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली.

    खड्ड्यात पावसामुळे पाणी साचलेले असल्याने कुणालाही कारचा दरवाजा उघडता आला नाही. दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला पडल्याने ते जखमी झाले. वाहनधारकांनी दिंडोरी पोलिसांना माहिती देताच क्रेनद्वारे कार डबक्यातून बाहेर काढली. तोपर्यंत नाकातोंडात पाणी गेल्याने कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला. जखमी दुचाकीस्वार मंगेश यशवंत कुरघडे, वय 25, रा. पिंपळगाव बहुला; अजय जगन्नाथ गोंद, वय 19, रा. नडगे गोट, ता. जव्हार, जि. पालघर; यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    काही फूट गाडी अगोदर बाजूला गेली असती तरी ते वाचले असते. ‘नाशिकला सकाळी जा आता उशीर झाला आहे’, असे नातेवाईक सांगत होते. त्यांचे ऐकले असते तरी काळापासून वाचता आले असते, अशी प्रतिक्रिया नातेवाइकांनी दिली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा