• Thu. Mar 19th, 2026
    …तर अब की बार ठाकरे बंधू 100 पार! उद्धवसेनेचा सर्व्हे काय सांगतो? मनसेला किता जागा?

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंना सत्ता राखण्याचे आव्हान आहे. यासाठी त्यांनी मनसेला सोबत घेण्याची तयारी दर्शवली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मागील अडीच दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आशियातील सगळ्यात श्रीमंत महापालिका असलेल्या सत्तेमुळेच शिवसेनेला आर्थिक ताकद मिळत राहिल्याची चर्चा होत असते. पण तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि आता ठाकरेंसमोर मुंबई महापालिकेवरील सत्ता राखण्याचं आव्हान निर्माण झालेलं आहे. त्यासाठी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्याची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेनं सुरु केली आहे. पण राज यांनी अद्याप तरी उद्धव यांना प्रतिसाद दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठानं मुंबईत एक सर्व्हे केला आहे.

    २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं ८४ जागा जिंकल्या. यातील निम्म्याहून अधिक माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. भाजप, शिंदेसेनेनं मुंबईत त्यांची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरु केलेले आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मनसेला सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहेत. ठाकरे बंधूंची युती झाल्यास काय परिस्थिती असेल, याचा सर्व्हे शिवसेना उबाठाकडून करण्यात आला आहे.

    uddhav thackeray trend

    मुंबईच्या वरळीत ५ जुलैला झालेल्या विजयी मेळाव्यानंतर शिवसेना उबाठाकडून मुंबईत सर्व्हे करण्यात आला. दोन बंधूंनी एकत्र येऊन निवडणूक लढवल्यास त्यांना १०० पेक्षा अधिक जागा मिळतील, अशी आकडेवारी सर्वेक्षणातून समोर आलेली आहे. विशेष म्हणजे मनसे ला २५ पेक्षा अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मुंबईत २०१२ मध्ये महापालिका निवडणुकीत मनसेनं २८ जागा जिंकल्या होत्या. हीच मनसेची मुंबई महापालिकेतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत युती केल्यास मनसे त्यांच्या सर्वोच्च कामगिरीच्या जवळ जाऊ शकते.

    uddhav raj and bmc

    २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकसंध शिवसेनेनं ८४, तर भाजपनं ८२ जागा जिंकल्या होत्या. तर मनसेला केवळ ७ जागा मिळाल्या होत्या. ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांना १०० हून अधिक जागांवर यश मिळेल, असा अंदाज आहे. मराठी मतदार बहुसंख्य असलेल्या गिरगाव, माझगाव, ताडदेव, लालबाग, परळ, भोईवाडा, दादर, माहीम, जोगेश्वरी, वांद्रे, मागाठाणे, गिरगाव, मुलुंड पूर्व, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी यासारख्या भागांमध्ये ठाकरे बंधूंच्या पक्षांना यश मिळू शकतं. याचा सगळ्यात मोठा फटका शिंदेसेनेला बसेल.

    ठाकरे बंधूंची युती न झाल्यास त्याचा फटका दोन्ही ठाकरेंना बसेल. राज यांच्या मनसेला केवळ १० जागांवर यश मिळू शकेल. तर उद्धव यांच्या पक्षाला ६५ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी ११४ जागांचा आकडा गाठणं गरजेचं आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा