Shivsena News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मुंबईच्या विकासकामांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुंबई महापालिका, मराठी माणूस, मिठी नदी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून त्यांनी विरोधकांना धारेवर धरले.
“मतदानाच्या आधी मराठी-मराठी म्हणायचे आणि निवडून आल्यावर ‘कोण रे तू?’ असे म्हणायचे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. महाविकास आघाडीच्या काळात सर्व ठप्प होते, मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचे काम केले. कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे आता भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. आम्ही तर रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या,” असे म्हणत त्यांनी मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष्य केले.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे मुद्दे मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात असल्याने घेता आल्या नाहीत, ओबीसी आरक्षण महत्त्वाचे आहे. ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नको होत्या, मात्र आता कोर्टाने आदेश दिले आहेत. निवडणूक झाली नसली तरी मुंबईतील कोणतीही कामं थांबलेली नाहीत. मुंबईत बदल होत आहेत, हे विजयराव खात्रीपूर्वक सांगू शकतात. मुंबईकर हे आमचे प्राधान्य आहे, तर इतरांसाठी कंत्राटदार फर्स्ट आहे,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, “मराठी माणसासाठी काय केले, असे म्हणत अनेकजण गळे काढतात, पण तो बाहेर का फेकला गेला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कोणाच्या काळात मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला, पत्राचाळीमध्ये कोणी माया गोळा केली? संक्रमण शिबिरात खुराड्यासारखं ठेवण्यात आलं ती मराठी माणसं नाहीत का?” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. तसंचमुंबईबाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
