• Sat. Jun 13th, 2026
    Eknath Shinde: दिनो मोरियाने तोंड उघडलं तर…; भर सभागृहातच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा, काय आरोप केले?

    Shivsena News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मुंबईच्या विकासकामांवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुंबई महापालिका, मराठी माणूस, मिठी नदी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून त्यांनी विरोधकांना धारेवर धरले.

    मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत बोलताना मुंबई आणि विकासकामांवर भाष्य करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिंदे यांनी मुंबई महापालिका, मराठी माणूस, मिठी नदी गाळ प्रकरण आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून विरोधकांना धारेवर धरले. मुंबईकरांसाठीच्या योजना, रखडलेले प्रकल्प आणि मागील सरकारच्या कामांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार हल्लाबोल केला. “मिठी नदीत गाळ काढायला मराठी माणूस नाही दिसला, दिनो मोरिया दिसला. पण दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होणार,” असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.

    “मतदानाच्या आधी मराठी-मराठी म्हणायचे आणि निवडून आल्यावर ‘कोण रे तू?’ असे म्हणायचे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. महाविकास आघाडीच्या काळात सर्व ठप्प होते, मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचे काम केले. कोविडमध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे आता भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. आम्ही तर रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या,” असे म्हणत त्यांनी मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचारावरून एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लक्ष्य केले.

    पुढे बोलताना शिंदे म्हणाले, “काही लोकांनी अर्धवट माहितीच्या आधारे मुद्दे मांडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोर्टात असल्याने घेता आल्या नाहीत, ओबीसी आरक्षण महत्त्वाचे आहे. ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नको होत्या, मात्र आता कोर्टाने आदेश दिले आहेत. निवडणूक झाली नसली तरी मुंबईतील कोणतीही कामं थांबलेली नाहीत. मुंबईत बदल होत आहेत, हे विजयराव खात्रीपूर्वक सांगू शकतात. मुंबईकर हे आमचे प्राधान्य आहे, तर इतरांसाठी कंत्राटदार फर्स्ट आहे,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

    दरम्यान, “मराठी माणसासाठी काय केले, असे म्हणत अनेकजण गळे काढतात, पण तो बाहेर का फेकला गेला याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कोणाच्या काळात मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला, पत्राचाळीमध्ये कोणी माया गोळा केली? संक्रमण शिबिरात खुराड्यासारखं ठेवण्यात आलं ती मराठी माणसं नाहीत का?” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. तसंचमुंबईबाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed