Nagpur Jail Prisoner Ends Life: नागपूर मध्यवर्ती कारागृहात खूनप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या बंदीवानाने अंतरवस्त्राच्या इलास्टिकने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. या घटनेने कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे.
धंतोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कैद्याचं नाव तुलसीराम शेंडे (वय 54) असे असून तो गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होता. भंडाऱ्यात एका हत्या प्रकरणात दोषी आढळल्याने 30 जून 2024 रोजी त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती.
Nagpur News: मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आई-बाबा, पण बस… नागपुरात NEET च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं
तुलसीराम शेंडे हा मध्यवर्ती कारागृहातील ‘छोटी गोल बैरक’ परिसरात असलेल्या ‘रंग काम विभाग’जवळील गोदामाजवळ एका खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलीस तपासानुसार, त्याने आपल्या अंडरवेअरच्या इलास्टिकचा वापर फास तयार करण्यासाठी केला होता. कारागृहाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच ही बाब धंतोली पोलिसांना कळविण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आता हे शोधत आहेत की, नेमक्या कोणत्या मानसिक, सामाजिक अथवा वैयक्तिक कारणांमुळे तुलसीराम शेंडेने असा टोकाचा निर्णय घेतला.
ही घटना अशा काळात घडली आहे, जेव्हा देशभरातील तुरुंग व्यवस्थेत कैद्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर, त्यांच्यावर होणाऱ्या ताणतणावावर आणि आत्महत्यांच्या वाढत्या घटनांवर सातत्याने चर्चा सुरू आहे. विशेषतः नागपूर सेंट्रल जेलमध्ये काही महिन्यांपूर्वीही आत्महत्येच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे जेल प्रशासनावर कैद्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अधिक दक्षता बाळगण्याचा दबाव वाढला आहे.
कैद्यांचे मानसिक आरोग्य आणि त्यासाठी आवश्यक असलेली समुपदेशनाची (काउन्सेलिंग) सुविधा प्रभावीपणे राबवण्यावर आता पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. तुरुंगातील कडक शिस्त, अस्वस्थता, कुटुंबापासून दुरावा, आणि शिक्षेच्या भीतीमुळे कैद्यांच्या मानसिक स्थितीवर मोठा ताण येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुलसीराम शेंडेच्या आत्महत्येने पुन्हा एकदा या व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकला असून, कारागृह प्रशासनाने तत्काळ सुधारात्मक उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

