• Wed. Mar 11th, 2026

    वर्ष सरली सतरा, शिवसेनेला पुन्हा खतरा; राज ठाकरे रिटर्न्स, फडणवीसांचा ‘काँग्रेस’ पॅटर्न

    वर्ष सरली सतरा, शिवसेनेला पुन्हा खतरा; राज ठाकरे रिटर्न्स, फडणवीसांचा ‘काँग्रेस’ पॅटर्न

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. फडणवीस सरकारच्या काळात हिंदी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाला विरोध करत राज यांनी सरकारला जीआर मागे घेण्यास भाग पाडले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून मराठीवरुन सुरु झालेली आंदोलनं पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. प्राथमिक शाळेत हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राज्यातील फडणवीस सरकारनं घेतला. त्याला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील मुद्दा लावून धरला. अखेर सरकारला दोन्ही जीआर मागे घ्यावे लागले. एकही आमदार नसताना राज यांनी ताकद दाखवून दिली. दरम्यानच्या काळात राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. पण या भेटीत काय चर्चा झाली, याचा तपशील अद्यापपर्यंत समोर आलेला नाही. त्यामुळे या भेटीचं ‘राज’ कायम आहे.

    मराठी भाषा, मराठी अस्मितेचा मुद्दा राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लावून धरला आहे. मिरारोडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला मारहाण केली. मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. या मारहाणीविरोधात स्थानिक व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी मोर्चा काढला. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी काल मनसेकडून मोर्चा काढण्यात आला. त्या मोर्चाआधी मनसेच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली. त्यानंतर त्यांना परवानगी नाकारण्यात आली. पण तरीही मोर्चा निघाला. नेत्यांची जोरदार भाषणं झाली. पोलिसांच्या कारवाईनं मोर्चा अधिक गाजला.

    मीरारोड ठाणे जिल्ह्यात येतं. ठाण्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे. त्यांच्या पक्षाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा मीरारोड, भाईंदर परिसरावर वरचष्मा आहे. कॅबिनेट मंत्री असलेले सरनाईक कालच्या मोर्चात सहभागी होण्यास गेले होते. पण तिथे त्यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या गेल्या. जनक्षोभ पाहता सरनाईक यांनी मोर्चातून काढता पाय घेतला. मनसेनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे शिवसेनेची कोंडी होण्याची, त्यांच्या नेत्यांवर नामुष्की ओढवण्याची ही पहिली वेळ नाही.

    वेळ बदलते, माणसं बदलतात, पण घटनांची पुनरावृत्ती होत राहते. इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होतं. राज ठाकरेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडली आणि २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. मराठी माणूस, मराठी भाषा पक्षाच्या ध्येयधोरणांच्या केंद्रस्थानी होती. मराठी पाट्या, मराठी मुलांना सरकारी नोकऱ्या असे प्रश्न मनसेनं हाती घेतले. त्यासाठी आंदोलनं मोर्चे सुरु झाले. राज ठाकरे तेव्हा मराठी तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले. २००८ मध्ये मनसेनं अनेक आंदोलनं केली. रेल्वे भरतीसाठी आलेल्या परप्रांतीय तरुणांना मारहाण झाल्याचे प्रकार घडले. त्यावेळी राज ठाकरेंची चर्चा संपूर्ण देशात होती.

    शिवसेनेची स्थापना मराठी माणसाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी १९६६ मध्ये झाली. पण १९८९ च्या सुमारास शिवसेनेनं विलेपार्लेतील विधानसभा निवडणूक हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर लढवली. याच मु्द्द्याच्या जोरावर पक्ष १९९५ मध्ये राज्यात सत्तेत आला. त्यामुळे मराठीचा मुद्दा काहीसा मागे पडला. मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरेंनी हाच मुद्दा हाती घेत शिवसेनेची गोची केली. मराठी जनांचा कैवार घेतल्यास मुंबईसह आसपासच्या शहरी पट्ट्यातील अमराठी मतदार पक्षापासून दूर जाण्याची भीती होती. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर हा मतदार सेनेच्या जवळ आला होता. त्यामुळे राज ठाकरे मराठी हृदयसम्राट झाल्याचा फटका शिवसेनेला २००९ मध्ये शिवसेनेला बसला.
    फॉर्म्युला जुना, तोच खेळ पुन्हा; ठाकरे बंधूंना शह देण्यासाठी भाजपचा ‘विधानसभा’ फॉर्म्युला
    २००८ मध्ये मनसेनं मराठीचा मुद्दा हाती घेत केलेल्या आंदोलनाचा परिणाम २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दिसला. राज ठाकरेंच्या पक्षानं पहिल्याच झटक्यात १३ आमदार विधानसभेत पाठवले. शिवसेना ६२ वरुन थेट ४४ वर घसरली. मुंबईत मनसेचे ६, तर शिवसेनेचे ४ आमदार निवडून आले. राज यांनी १३ शिलेदार निवडून आणले आणि त्यांच्या उमेदवारांमुळे अनेक ठिकाणी सेना-भाजपला फटका बसला. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सत्तेत आली.

    २००८ च्या सुमारास राज ठाकरे फॉर्मात होते. त्यांची भाषणं प्रक्षोभक होती. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. विलासराव देशमुख यांच्याकडे राज्याची सुत्रं होती. शिवसेनेला पद्धतशीरपणे झटका देण्यासाठी त्यावेळी काँग्रेसनं मनसेचा खुबीनं वापर केल्याची चर्चा झाली. राज ठाकरे ‘मोठे’ झाल्यास शिवसेनेला त्याचा फटका बसणार, असा विचार काँग्रेसनं केला. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तसा निकालही दिसला.
    शिंदे रडारवर, अजितदादा ऑप्शनला; भाजप लागला कामाला, दिल्लीच्या आदेशानंतर प्लान बदलला
    २००८ नंतर आता १७ वर्षांनंतर म्हणजेच २०२५ मध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची मराठीवरुन सुरु असलेली आंदोलनं चर्चेत आहेत. राज्यात भाजपचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची हॉटेलात भेट घेतली. त्यानंतर मनसे किती आक्रमक झाली, त्यांच्या आंदोलनांनी कसा जोर धरला ते महाराष्ट्रानं पाहिलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्‍यांचा पक्ष बदलला तरी त्यांच्या रडारवर आलेला पक्ष तोच आहे. तेव्हाही रडारवर शिवसेना होती आणि आताही रडारवर शिवसेनाच आहे. फरक फक्त इतकाच आहे, तेव्हाची शिवसेना उद्धव ठाकरेंची होती, आता रडारवर असलेली शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे.

    पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदेंनी ५७ जागा जिंकून त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे. भाजपनं २०२९ च्या निवडणुकीसाठी शतप्रतिशतचा नारा दिलेला आहे. पण यामध्ये शिंदेंची शिवसेना हाच मोठा अडथळा आहे. कारण दोन्ही पक्षांचा मतदार सारखाच आहे. भाजपला राज्यात हिंदुत्त्ववादी मतांमध्ये अन्य कोणताही वाटेकरी नको आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड या उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजप हाच एकमेव हिंदुत्त्ववादी पक्ष आहे. त्यामुळे हिंदुत्त्ववादी मतं एकगठ्ठा भाजपला मिळतात. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती निर्माण व्हावी, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे शिंदेसेना भाजपच्या रडारवर आहे.
    आधी सरकारवर थेट टीका टाळली न् आता आदेश काढला; युती होणार की नाही? राज ठाकरेंनी संभ्रम वाढवला
    मुंबई आणि आसपासच्या भागात मराठी मतदार हाच शिवसेनेचा प्रमुख मतदार आहे. आता राज ठाकरे ‘मोठे’ झाल्यास मराठी मतांची फाटाफूट होऊन शिंदेसेनेला फटका बसू शकतो, याची जाणीव भाजपच्या धुरिणांना आहे. मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी मराठी मतांचं विभाजन महाशक्तीसाठी गरजेचं आहे. राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेऊन बाळासाहेबांचे विचार सांगणाऱ्या शिवसेनेची गोची केलेली आहे. त्यामुळे २००७ नंतर १७ वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेची कोंडी झालेली आहे. मुख्यमंत्री आणि सेनेचं नेतृत्व बदललेलं आहे, सेनेची कोंडी करण्याची पद्धत मात्र तीच आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा