• Sat. Sep 5th, 2026

‘शिवसेना संपली, ठाकरे संपले, असे म्हणणारे मूर्खांच्या नंदनवनात राहतात’, कोकणातील माजी आमदाराचा घणाघात

‘शिवसेना संपली, ठाकरे संपले, असे म्हणणारे मूर्खांच्या नंदनवनात राहतात’, कोकणातील माजी आमदाराचा घणाघात

Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बाळ मानेंनी या भेटीवर प्रतिक्रिया देताना, हे दोन्ही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले असून, या भेटीमुळे महायुती सरकारमधील नेत्यांना भीती वाटत आहे. तसेच, शिंदे गटात गेलेल्यांना काही लाभ मिळाला नाही, ते परत येतील, असा दावाही मानेंनी केला आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)

प्रसाद रानडे, रत्नागिरी : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा आहे, ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची. मुंबईमध्ये झालेल्या शनिवारच्या मेळाव्यात हे दोन्ही भाऊ पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. इतकंच नाही तर आता आम्ही एकत्र आलो आहोत. ते दूर जाण्यासाठी नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या बरोबर आपण कायम असल्याचे स्पष्ट केलं आहे. आता यावरूनच महायुतीमधील नेते, मनसे आणि ठाकरे गटातील नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अशीच एक मोठी प्रतिक्रिया कोकणातील पूर्वाश्रमीचे भाजपचे असलेले मात्र सध्या ठाकरे गटाचे उपनेते असलेले माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केली आहे.

हे दोन्ही भाऊ केवळ मराठीच्या मुद्द्यावरती म्हणून एकत्र आले आहेत, आणि त्याकडे ठाकरे कुटुंब म्हणून पाहायला हवं. मात्र महायुतीमधून राजकीय अँगल देत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोघं एकत्र आले अशा स्वरूपाच्या वावड्या उठवल्या जात आहेत, असा निशाणा बाळ माने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाकरे घराण्याचा करिष्मा आहे, ठाकरेंचा एक ब्रँड आहे. मनसेचे आमदार, खासदार नसले तरी त्यांचीही सात ते आठ टक्के मराठीची वोट बँक आहे आणि कोणत्याही कुटुंबात वाद असतात. मात्र ते काही वर्षांनी मिटतातच, जे काही पुढील पिढी धरून बसत नाहीत. असं सांगत आता हे ठाकरे बंधू एकत्रच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी दिले आहेत.

मुळातच भाजपने शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला तो आपली पोळी भाजली जावी म्हणून आणि म्हणूनच एकनाथ शिंदे यांना त्यांनी मुख्यमंत्री केलं, असाही हल्लाबोल बाळ माने यांनी केला आहे. मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याने याचा परिणाम भविष्यात नक्कीच चांगला झाल्याचे पाहायला मिळेल, असे मत बाळ माने यांनी व्यक्त केल आहे.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना सोडून भाजप बरोबर गेले. मात्र त्यावेळी अनेकांना अमिष दाखवण्यात आली. ईडीच्या कारवाईची भीती घालण्यात आली आणि म्हणूनच काही नेते कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेले. पण याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत फारसा दिसला नाही पण विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना आणि काही अमिष दाखवल्यामुळेच विधानसभेला त्यांना बहुमत मिळालं, असेही आरोप माने यांनी केला आहे.

डावीकडून राज, उजवीकडून उद्धव; मिठीने भूतकाळ पुसला, अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे भारले!


आता ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आणि त्याचा नक्कीच चांगला राजकीय परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकाही नक्कीच अटीतटी होतील. त्याचा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम होईल. महायुतीच्या सरकारमधील नेत्यांना असं वाटत आहे की आमच्याशिवाय आता दुसरं कोणीच नाही. ठाकरे, शिवसेना संपली असं काहींना वाटतं आहे. पण ते मूर्खांच्या नंदनवानात आहेत, अशी टीका बाळ माने यांनी केली आहे. शिंदे सेनेबरोबर गेलेल्या सगळ्यांना नक्कीच लाभ नाही मिळाला, त्यातील परत येतीलच आणि या सगळ्याचा परिणाम निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल, असं मत व्यक्त करत बाळ माने यांनी महायुतीच्या राज्यातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.आणखी वाचा