• Thu. Mar 12th, 2026
    …तर ठाकरे बंधू 118, भाजप 64; लक्षवेधी आकडेवारी ऐतिहासिक युती घडवणार? शिंदेंची धडधड वाढवणार

    मुंबई विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले असले तरी, ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चेने जोर धरला आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र दिसणार आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं नेत्रदीपक यश मिळवलं. आतापर्यंत कोणत्याही युती, आघाडीला असं यश कधीही मिळवता आलेलं नाही. या निवडणुकीत दोन्ही ठाकरेंच्या पक्षाची धूळधाण उडाली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ २० जागा मिळाल्या. तर राज ठाकरेंच्या मनसेला भोपळाही फोडता आलेला नाही. तीन वर्षांपूर्वी झालेल्या बंडाचा मोठा फटका उद्धव ठाकरेंना बसलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा जोर धरु लागली आहे. येत्या ५ जुलैला दोन्ही ठाकरे वरळीतील कार्यक्रमात सोबत दिसतील.

    उद्धव आणि राज यांनी एकत्र यावं अशी बाळासाहेबांची इच्छा होती. पण अखेरपर्यंत ती इच्छा पूर्ण झाली नाही. दोन्ही ठाकरे कधीच सोबत आले नाहीत. पण बाळासाहेबांना न जमलेली गोष्ट महायुती सरकारनं काढलेल्या प्राथमिक शाळेतील हिंदी भाषेच्या सक्तीनं शक्य झाली. या मुद्द्याच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अतिशय आक्रमकपणे उतरले. मोठा जनक्षोभही उसळला. अखेर हिंदी भाषेबद्दलचे दोन्ही जीआर सरकारला मागे घ्यावे लागले. सरकार नमवल्यानंतर आता ठाकरेंचे पक्ष जल्लोष करण्यासाठी सोबत येणार आहेत. या कार्यक्रमाला दोन्ही ठाकरे हजर असतील. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांच्या युतीच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.

    राज आणि उद्धव सोबत आल्यास मुंबईत काय चित्र दिसू शकेल याबद्दल तर्कवितर्क सुरु आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक, निवडणूक रणनीतीकार अमिताभ तिवारी यांनी एक रंजक आकडेवारी मांडली आहे. मुंबईत सगळ्या पक्षांनी २०१७ मध्ये स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. त्यांची भाजपसोबतची युती तुटली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेनं ८४, भाजपनं ८, काँग्रेसनं ३१, मनसेनं ७, एकसंध राष्ट्रवादीनं ९ आणि अन्य पक्षांनी १४ जागा जिंकल्या.

    raj thackeray trend

    २०१७ च्या पालिका निवडणुकीत शिवसेनेला २८.३ टक्के, भाजपला २७.५ टक्के, काँग्रेसला १६.२ टक्के, मनसेला ७.७ टक्के मतदान झालं होतं. अमिताभ तिवारींनी दिलेल्या आकडेवारीनुसार दोन्ही ठाकरे त्या निवडणुकीत सोबत आले असते तर त्यांनी ११८ जागा जिंकल्या असत्या. दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या मतविभाजनामुळे भाजप, काँग्रेसला फायदा झाला. युती असती तर भाजपला ६४ आणि काँग्रेसला २५ जागाच मिळाल्या असत्या.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यभरात १० टक्क्यांहून कमी मतं मिळाली. त्यांना केवळ २० जागा जिंकता आल्या. पण मुंबईत त्यांची कामगिरी चांगली झाली. ठाकरेंनी मुंबईत भाजपपाठोपाठ २३.२ टक्के मतं घेत १० जागांवर विजय मिळवला. शिंदेंच्या शिवसेनेनं राज्यभर चांगली कामगिरी केली. पण मुंबईत त्यांना १७.७ टक्क्यांसह केवळ ६ जागा जिंकता आल्या. तर राज्यात १.६ टक्के मतं घेणाऱ्या मनसेनं मुंबईत मात्र ७.१ टक्के मतं घेतली.

    raj and uddhav

    शिवसेना आणि मुंबई, ठाकरे आणि मुंबई यांचं नातं कायम घट्ट राहिलं आहे. मुंबईकरांनी नेहमीच ठाकरेंना ताकद दिलेली आहे. हा इतिहास पाहता राज आणि उद्धव यांची युती छाप पडू शकते. २०१७ मध्ये शिवसेना आणि मनसेची मतांची एकत्रित टक्केवारी ३६ टक्क्यांच्या घरात जात होती. त्यावेळी भाजपला २७.५ टक्के मतं होती.

    Prakash Mahajan: ठाकरे बंधूंचं मनोमिलन, ShivSena-MNS एकत्र; प्रकाश महाजनांचं विरोधकांना उत्तर

    २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजपला २९.२ टक्के, शिंदेसेनेला १७.७ टक्के मतं मिळाली. तर ठाकरेसेनेला २३.२ टक्के आणि मनसेला ७.१ टक्के मतदान झालं. याचा अर्थ दोन्ही ठाकरे सोबत आल्यास मतांची टक्केवारी ३० टक्क्यांच्या पुढे जाते. त्यातच शिंदेंची मुंबईत फारशी ताकद नाही. हिंदी भाषासक्तीचा जीआर त्यांच्याच मंत्र्‍याच्या खात्याकडून निघाला होता. हिंदी भाषासक्तीवरुन शिंदेसेना पूर्णपणे गंडलेली दिसली. त्याचा फटका त्यांना मुंबईसह आसपासच्या भागात बसेल. बाळासाहेबांनी मराठीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची स्थापना केली. पण त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या शिंदे यांच्याच पक्षातील मंत्र्‍याच्या खात्यातून हिंदीसक्तीचा जीआर निघाला. यामुळे सेनेचा पारंपारिक मराठी मतदार त्यांच्या पक्षापासून दूर जाऊ शकतो.

    हिंदी भाषासक्तीचा मुद्दा तापण्यापूर्वी वोट वाईब एजन्सीकडून एक सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी ५२ टक्के मुंबईकरांनी उद्धव आणि राज यांनी युती केल्यास त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीत पाठिंबा देऊ, असं मत मांडलं. तर केवळ २६ टक्के मुंबईकरांनी शिंदेसेनेच्या बाजूनं कौल देऊ, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे उद्धव आणि राज यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक युतीत लढवल्यास त्याचा फायदा दोन्ही बंधूंना होऊ शकतो.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा