• Thu. Mar 19th, 2026
    ती रात्र आठवूनही धस्स, नातवाने कचऱ्यात फेकलेल्या आजीची व्यथा; त्याला काही करु नका, नाहीतर…

    Mumbai Old Lady thrown in Garbage : महापालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या या आजींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी हा भयावह प्रसंग कथन केला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : ‘मी कुठे आहे, आजूबाजूला काय आहे, काहीच कळत नव्हते. होता फक्त दाट अंधार आणि एक विचित्र कुबट वास… उभे राहण्याचा प्रयत्न केला, पण तितकी ताकद नव्हती. ज्याच्यात मी माझ्या गमावलेल्या लेकरांना पाहत होते, त्या नातवानेच जंगलात आणून टाकल्याचा धक्का सहन होत नव्हता. ती रात्र आठवली तरी काळजात धस्स होते…’ 68 वर्षीय आजींची ही मन हेलावणारी व्यथा!

    यशोदा गायकवाड असे या हतबल आजींचे नाव. त्यांच्या 33 वर्षांच्या नातवाने 21 जूनच्या रात्री त्यांना आरेच्या जंगलात आणून सोडले. तो प्रसंग आठवला तरी त्यांचा थरकाप उडतो. ‘तिघांनी रिक्षातून मला इथे सोडून दिले. त्यांच्यामागे धावण्याइतकी ताकद नव्हती. तिथेच पडले, हाका मारत राहिले. देवाचे नाव घेत सकाळ व्हायची वाट पाहत होते. कोणत्या तरी लाल गाडीतल्या माणसांनी मला उचलले आणि इथे आणले…’ थरथरत्या आवाजात यशोदा आजी सांगत होत्या.

    महापालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेल्या या आजींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने त्यांची विचारपूस केली तेव्हा त्यांनी हा भयावह प्रसंग कथन केला. ‘इथल्या डॉक्टरांनी जीव वाचवला. खाऊपिऊ घातले. ते देवासारखे वागले’, असे त्या सांगतात. पण रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर कुठे जायचे हा प्रश्न त्यांना सतावत आहे.

    यशोदा मूळच्या बीड जिल्ह्यातल्या. लग्नानंतर मुंबईला आल्या. काही वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांना दोन मुले होती. मोठा मुलगा 15-16 वर्षांचा असताना गेला. त्यानंतर मुलीचाही मृत्यू झाला. तिच्याच मुलाकडे म्हणजे नातवाकडे त्या काही महिन्यांपूर्वी राहायला आल्या होत्या. त्याआधी यशोदा भाड्याने राहायच्या.

    पतीच्या मृत्यूनंतर पोटापाण्यासाठी त्यांनी चर्मकार म्हणून काम केले. चपला, छत्र्या शिवून उदरनिर्वाह केला. मात्र काही दिवसांपासून त्यांना प्रकृती साथ देत नव्हती. त्यांना त्वचेचा कॅन्सर आणि मधुमेह आहे. सोबत असावी म्हणून त्यांनी नातवाकडे आश्रय घेतला. त्याबदल्यात आपल्या दुकानाचे भाडे त्या नातवाला देत होत्या.

    ‘त्याला काही करू नका’

    माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य केल्याबद्दल यशोदा यांच्या नातवासह अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र आजीला नातवाचीच काळजी वाटत आहे. त्याच्या मुलाचे काय होईल, याची चिंता त्यांना सतावत आहे. ‘माझ्या नातवाची चूक झाली, पण त्याला त्रास होईल असे काही करू नका’, अशी विनंती त्या करतात. यशोदा यांची नातसून शिल्पा सध्या त्यांच्या सोबत आहे. ‘झाले ते वाईट झाले. आमचे चुकले’, अशा शब्दांत त्या माफी मागतात.

    Navi Mumbai Rain |15 दिवसांतच रस्त्यांची दुर्दशा; रेती, खडी अधिकाऱ्यांना भेट, मनसे आक्रमक

    सरकारी योजना आहेत कुठे?

    यशोदा यांच्यासोबतच्या या या घटनेमुळे असहाय वृद्धांपुढील समस्या पुढे आल्या. आजारपण, आधार नसल्यामुळे या ज्येष्ठांना मानसिक, शारीरिक त्रास सहन करत कुणावर तरी अवलंबून राहावे लागते. दोन वेळच्या अन्नासाठी, औषधांसाठी आपल्याच माणसांपुढे हात पसरावे लागतात, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहेत, वृद्धाश्रमही आहेत; परंतु या सुविधा गरजूंपर्यंत पोहोचतात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा