Raj Thackeray And Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अतिशय मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू आगामी काळात एकाच मंचावर एकत्र दिसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा दिवस फार दूरचा आहे, असंही नाही. येत्या 5 जुलैला दोन्ही बंधू एकाच मंचावर एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे. या चर्चा खऱ्या आहेत, असं दर्शवणारं ट्विट ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चा होण्याआधीच हिंदीबाबतचे शासन निर्णय मागे घेतले. कारण त्यांना मराठी माणसांना एकत्र येऊ द्यायचं नव्हतं. पण तरीही मराठी ताकद एकत्र येईलच”, असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र यावेत, यासाठी पडद्यामागे हालचाली घडत असल्याची चर्चा आहे. 5 जुलैचा मोर्चा रद्द झाला असला तरी 5 जुलैला भव्य जल्लोष मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या जल्लोष मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकाच मंचावर एकत्र आलेले बघायला मिळण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत एक्स अकाउंटवर सूचक पोस्टदेखील करण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
‘ठरलं… 5 जुलै मराठी विजय मेळावा! ठाकरे येत आहेत…’, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ठाकरे येत आहेत, या वाक्यात भरपूर काही शक्यता सामावल्या आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांआधी ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे. त्याचसाठी पडद्यामागे हालचाली घडत असल्याची शक्यता आहे. एवढंच काय तर रविवारी आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाई हे देखील सहभागी झाले होते. तसेच मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी आता वाढताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना जास्त बळ मिळताना दिसत आहे.
ठाकरे बंधू खरच एकत्र येणार? | Satish Walunj Interview | Shivsena & MNS | Maharashtra Times
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर देखील होऊ शकतो. कारण दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशी अनेक वर्षांपासून लाखो मराठी नागरिकांची अपेक्षा आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या चाहत्या वर्गाला दोन्ही भावांनी एकत्र यावं, अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. ही इच्छा आगामी काळात पूर्ण झाली तर कदाचित महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या उंचीवर जाऊ शकतं. अर्थात या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत. खरंच दोन्ही बंधू एकत्र येणार का? ते आगामी काळात स्पष्ट होईल. पण ठाकरेंच्या 5 जुलैच्या मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात औत्सुक्य निर्माण केलं आहे.

