Palghar Three Child Drown: बोईसर येथे पाण्याने भरलेल्या खड्ड्यात खेळत असताना तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर मुलांच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.
पालघर तालुक्यातील बोईसर- काटकरपाडा परिसरात मोकळ्या खाजगी जागेत असलेल्या खड्ड्यांमध्ये पावसामुळे पाणी भरले आहे. याच परिसरातील सुरज यादव, धीरज यादव, अंकिता गुप्ता आणि शेजारील आणखीन एक मुलगा अशी एकूण चार लहान मुलं पाण्याने भरलेल्या या खड्ड्यात खेळण्यासाठी, पोहण्यासाठी गेली होती. खेळता- खेळता पाण्याने भरलेल्या खड्ड्यातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चारपैकी तीन मुले खड्ड्यातील पाण्यात बुडाली. चौघांपैकी एक मुलगा कसाबसा पाण्याबाहेर आल्याने त्याचा जीव वाचला आहे, अशी माहिती आहे.
Raigad News: पाण्याचा कॉक बंद करण्यासाठी छतावर गेली अन् अनर्थ घडला, चौथ्या मजल्यावरुन पडून तरुणीचा करुण अंत
शुक्रवारी (27 जून) दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोईसर पोलीस आणि तारापूर औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. खड्ड्यातील पाण्यात बुडालेल्या तीन मुलांना पाण्याबाहेर काढून त्यांना टीमा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तेथे सुरज यादव, धीरज यादव आणि अंकिता गुप्ता या तीन मुलांना तपासून मृत घोषित केले आणि कुटुंबाने एकच आक्रोश केला. त्यानंतर मृत तीन मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर येथे पाठवण्यात आले आहेत.
मृत सुरज यादव, धीरज यादव ही दोन्ही लहान मुले सख्खे भाऊ आहेत. तर, अंकिता गुप्ता या मुलीचा देखील या घटनेत मृत्यू झाला आहे. पाण्यात बुडून घरातील लहान मुलांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

