शालेय अभ्यासक्रमात हिंदी विषय सक्तीचा केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
5 तारखेच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर पाठिंबा दिलाय. महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो, तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका. मराठीच्या समर्थनार्थ पुकारलेल्या 5 जुलै रोजीच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी एक पत्र ट्विट करत भूमिका स्पष्ट केली आहे.
मार्ग ठरेना, वेळ जुळेना; शिवसेना उबाठा, मनसेत मोर्चासंदर्भात चर्चा; ‘मार्ग’ कसा निघणार?पत्रात जयंतराव पाटील यांनी म्हटले की, महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) याअंतर्गत त्रिभाषा सूत्राचं समीकरण पुढे करत इयत्ता पहिलीपासून शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा बंधनकारक करण्याचे योजिले आहे. ह्याविरोधात महाराष्ट्रात मराठी भाषिकांमध्ये टोकाचं जनमत तयार होत आहे. अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ, भाषातज्ञ अशा सर्व मान्यवरांनी त्रिभाषा सूत्र इयत्ता पहिलीपासून राबविण्यास विविधं आक्षेप नोंदविले आहेत. पण कुणालाही न जुमानता राज्य सरकार ‘हिंदी सक्ती’साठी हट्ट धरून बसलं आहे असे ते म्हणाले.
खरं तर, महाराष्ट्राच्या जनमानसाचा कानोसा घेतलात तर जाणवतं की, कुणाचाही विविध भाषा शिकण्याला किंबहुना हिंदी भाषेलाही विरोध नाही, पण इयत्ता पहिलीपासूनच प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असा आग्रह आहे, जो योग्य आहे. शैक्षणिक धोरणाच्या त्रिभाषा सूत्राआडून मातृभाषेला डावलण्यासाठी प्रयत्न होत असतील तर मराठी माणूस एकदिलाने त्याचा विरोध करणार, ह्याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी असा इशाराही दिला.
महाराष्ट्र सरकारच्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला विरोध करण्यासाठी येत्या शनिवारी, 5 जुलै 2025 रोजी तमाम मराठीजनांकडून मुंबईत एक मोर्चा पुकारण्यात आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचा ह्या मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्राहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा महाराष्ट्रासाठी आणि जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न उभा राहतो तेव्हा राष्ट्रासाठी पक्षीय भेदाभेद बाजूला सारून उभं राहणं हेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ पक्षाचं स्पष्ट धोरण आहे. म्हणून पदाधिकारी, कार्यकर्त्ये सर्वांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटले.

