Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने शाळा सुरु असतानाच मधल्या सुट्टीत टोकाचं पाऊल उचललं. मधल्या सुट्टीत सर्व विद्यार्थी जेवणासाठी गेले असतानाच शिक्षकाने दोरीने वर्गात गळफास घेतला. मधली सुट्टी संपल्यानंतर मुलं जेव्हा वर्गात आले तेव्हा ते समोर दिसणारं चित्र पाहून हादरून गेले. या घटनेची पाचोरा शहरातील नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरु आहे.
पाचोरा शहरात असलेल्या एका शाळेत शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली. शाळेतील चौथ्या मजल्यावरील एका खोलीत आत्महत्या केल्याचे 25 जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आले. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.
पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील रविंद्र महाले हे सध्या पाचोरा शहरात वास्तव्यात होते. ते पाचोरा शहरातील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, बुधवारी सकाळी दहा वाजेच्या वाजेच्या सुमारास रविंद्र महाले यांनी शाळेतील एका वर्गखोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. रवींद्र महाले यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांची मुलगी बाहेरगावी शिक्षण घेत होती. त्यामुळे महाले यांनी एक दिवस आधीच मूलांना देखील घरी बोलून घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती समजताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली. यानंतर पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत सदर घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, रविंद्र यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, शिक्षकाने शाळेत आत्महत्या केल्याने आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यार्थी तसेच सहकारी शिक्षकांमध्ये शोककळा पसरली आहे.

