Chhagan Bhujbal News: राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी सिनेमा आणि मालिकांमुळे ही भाषा आधीच घराघरात पोहोचली आहे, त्यामुळे सक्ती करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, या विषयावर सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.
छगन भुजबळ म्हणाले, “माझं मत वेगळे आहे. हिंदी सिनेमा, सीरियल यामुळे घराघरात हिंदी अगोदरच पोहोचली आहे. हिंदी लादण्याची गरज नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी सुद्धा हिंदी सक्ती नको, असे म्हटले आहे. त्यामुळे, हिंदी भाषेचा दबाव टाकणे योग्य नाही,” अशी रोखठोक भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे.
भुजबळ येवला दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना हिंदी सक्तीबद्दल प्रश्न विचारले. त्यावर ते म्हणाले, “पहिलीपासून तीन भाषा टाकल्या तर ते कठीणच होईल. आमचा हिंदीला विरोध नाही. मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेल्या 30 वर्षांपासून अध्यक्ष आहे. रविवारी मुंबईत हिंदी सभा व्हायची तेव्हा फुकट शिकायला मिळायचे. आम्ही मराठी शाळेत जरी शिकलो, तरी आजकाल हिंदी सर्वांना येते आहे.”
Babanrao Lonikar : ‘चुकलो नसलो तरी माफी मागतो’; बबनराव लोणीकर यांची आखडती माफी
भुजबळ यांनी अंदरसुल शाळेतील एका घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, “अंदरसुल शाळेत मुली जापनीज भाषेत बोलत होत्या. पण त्या मराठी शाळेत शिकत आहे.”
दरम्यान, पावसाळी अधिवेशनात हिंदी सक्तीवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याबद्दल भुजबळ म्हणाले, “आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन हिंदी सक्ती विषयी अंतिम निर्णय घेऊ. पावसाळी अधिवेशनात खूप प्रश्न आहेत. शेती, अवकाळी पाऊस, शिक्षण, रस्ते असे शेकडो प्रश्न आहेत. हिंदीच्या प्रश्नापेक्षा इतर प्रश्न देखील महत्त्वाचे आहे. मंत्री दादा भुसे हिंदी प्रश्नावर राज ठाकरे यांना भेटले आहे. तसेच अनेक नेत्यांना देखील जाऊन भेटत आहेत,” असंही भुजबळ म्हणाले.

