• Mon. Mar 16th, 2026

    छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हिंदी सक्तीबाबतच्या भूमिकेवरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या

    छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहेर; हिंदी सक्तीबाबतच्या भूमिकेवरून सर्वांच्याच भुवया उंचावल्या

    Chhagan Bhujbal News: राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिंदी सिनेमा आणि मालिकांमुळे ही भाषा आधीच घराघरात पोहोचली आहे, त्यामुळे सक्ती करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, या विषयावर सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.

    हिंदी सक्तीवरून भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक: हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात सध्या वाद सुरू असून पहिली इयत्तेपासून विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयाला ठाकरे बंधूंनी जोरदार विरोध केला आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनीही याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. हिंदी लादण्याची गरज नाही. कारण हिंदी सिनेमा आणि मालिकांमुळे हिंदी भाषा आधीच घराघरात पोहोचली आहे, असं मत त्यांनी मांडलं आहे. येवला येथे बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

    छगन भुजबळ म्हणाले, “माझं मत वेगळे आहे. हिंदी सिनेमा, सीरियल यामुळे घराघरात हिंदी अगोदरच पोहोचली आहे. हिंदी लादण्याची गरज नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी सुद्धा हिंदी सक्ती नको, असे म्हटले आहे. त्यामुळे, हिंदी भाषेचा दबाव टाकणे योग्य नाही,” अशी रोखठोक भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे.

    भुजबळ येवला दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना हिंदी सक्तीबद्दल प्रश्न विचारले. त्यावर ते म्हणाले, “पहिलीपासून तीन भाषा टाकल्या तर ते कठीणच होईल. आमचा हिंदीला विरोध नाही. मी स्वतः एका हिंदी प्रसारक संस्थेचा गेल्या 30 वर्षांपासून अध्यक्ष आहे. रविवारी मुंबईत हिंदी सभा व्हायची तेव्हा फुकट शिकायला मिळायचे. आम्ही मराठी शाळेत जरी शिकलो, तरी आजकाल हिंदी सर्वांना येते आहे.”

    Babanrao Lonikar : ‘चुकलो नसलो तरी माफी मागतो’; बबनराव लोणीकर यांची आखडती माफी

    भुजबळ यांनी अंदरसुल शाळेतील एका घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, “अंदरसुल शाळेत मुली जापनीज भाषेत बोलत होत्या. पण त्या मराठी शाळेत शिकत आहे.”

    दरम्यान, पावसाळी अधिवेशनात हिंदी सक्तीवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याबद्दल भुजबळ म्हणाले, “आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन हिंदी सक्ती विषयी अंतिम निर्णय घेऊ. पावसाळी अधिवेशनात खूप प्रश्न आहेत. शेती, अवकाळी पाऊस, शिक्षण, रस्ते असे शेकडो प्रश्न आहेत. हिंदीच्या प्रश्नापेक्षा इतर प्रश्न देखील महत्त्वाचे आहे. मंत्री दादा भुसे हिंदी प्रश्नावर राज ठाकरे यांना भेटले आहे. तसेच अनेक नेत्यांना देखील जाऊन भेटत आहेत,” असंही भुजबळ म्हणाले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय. यापूर्वी लोकमत आणि न्यूज १८ लोकमत या संस्थांमध्येही कामाचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed