• Sat. Mar 7th, 2026

    पुण्यात काँग्रेसला खिंडार पडणार? आक्रमक नेता रामराम करणार? पोस्टद्वारे सूचक इशारा

    पुण्यात काँग्रेसला खिंडार पडणार? आक्रमक नेता रामराम करणार? पोस्टद्वारे सूचक इशारा

    Pune Congress News- पुण्यात काँग्रेसमधून दोन माजी आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आता आक्रमक नेताही पक्ष सोडू शकतो. सोशल मीडिया पोस्टद्वारे नेत्याने सूचक इशारा दिला आहे.

    (फोटो– Lipi)

    आदित्य भवार, पुणे : पुणे काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजीचा भडका उडताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांत काँग्रेसला दोन माजी आमदार गमवावे लागले असून, आता युवक काँग्रेसमधील आक्रमक, रस्त्यावर उतरणारे आणि जनआंदोलनात सक्रिय राहिलेले पदाधिकारीही पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. युवक काँग्रेसचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष आणि सध्या पदावर असलेले पदाधिकारी राहुल शिरसाट यांनी आज सोशल मीडियावरून थेट नाराजी व्यक्त करत “निष्ठावंत डावलणाऱ्या काँग्रेसचा पुण्यात लवकरच अंत होणार, आणि लवकरच नवी सुरुवात!” अशा शब्दांत भावनिक आणि आक्रमक इशारा दिला आहे.

    ही पोस्ट काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींचा उघडपणे पर्दाफाश करत असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष आणि दिल्लीवरून लादल्या जाणाऱ्या नेत्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला दिसतो आहे.

    गटबाजी आणि नेतृत्वातील दरीचा परिणाम
    माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा राजीनामा देत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचा पुणे जिल्ह्यातील संख्याबळ पूर्णपणे संपले. काँग्रेसचा एकही आमदार सध्या पुण्यात नाही. या राजकीय दुष्काळात स्थानिक पातळीवर निष्ठावान कार्यकर्ते, पदाधिकारी ज्या प्रकारे दुर्लक्षित केले जात आहेत, त्यातून राहुल शिरसाट यांची प्रतिक्रिया ही फक्त सुरुवात वाटत आहे.

    संगीता तिवारींनी व्यक्त केली नाराजी
    या पार्श्वभूमीवर महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनीही नुकतीच माहिती देत शहराध्यक्ष प्रती नाराजी व्यक्त केली होती. स्थानिक नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून काँग्रेसमध्ये संघटनात्मक आणि निर्णय प्रक्रियेत गंभीर विसंगती आहे हे अधोरेखित होते.

    राहुल शिरसाट कोण?
    राहुल शिरसाट हे युवक काँग्रेसमधील आघाडीचे नेते असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा राज्यातील भाजप नेत्यांच्या पुणे दौऱ्यांदरम्यान काळे झेंडे दाखवणं, रास्ता रोको, निदर्शनं यामध्ये ते अग्रभागी होते. अनेकदा पोलीस कारवाईलाही सामोरे गेलेले शिरसाट हे काँग्रेसच्या रस्त्यावरच्या लढवय्या प्रतिमेचे मूळ चेहरा होते. त्यामुळे त्यांची संभाव्य एक्झिट ही पक्षासाठी केवळ इमेजचा नाही, तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संपवणारी ठरू शकते.

    वाढणारी नाराजी आणि संभाव्य राजीनाम्यांचे सावट
    राहुल शिरसाट यांनी आपल्याशी संवाद साधताना स्पष्ट केलं की, “वर्षानुवर्षे पक्षासाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांना डावललं जातं, आणि हक्काच्या पदांवर निष्ठा नसलेल्या मंडळींची वर्णी लागते. आमच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या पण काहीच बदल झाला नाही. त्यामुळे पुढील निर्णय स्वाभिमान जपण्यासाठी घेतला जाईल.”त्यांच्या वक्तव्यामुळे युवक काँग्रेसमधील आणखी काही पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पक्षाला रामराम करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    राजकीय भूकंपाची नांदी?
    सध्या महाराष्ट्रात काँग्रेसला भाजप आणि शिंदे गटाकडून सतत आव्हान दिलं जात आहे. अशातच पक्षांतर्गत गटबाजी, नेतृत्वातील अंतर, निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान हे सगळं मिळून काँग्रेससाठी नव्या राजकीय संकटांची नांदी ठरू शकतं.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed